Ramdas Kadam On Anil Parab : बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? अनिल परबांच्या आरोपावर रामदास कदमांचं जोरदार प्रत्युत्तर

खेड : एका जुन्या घटनेने पुन्हा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या आगीत भाजण्याच्या घटनेवरुन शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आणि परबांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. यासोबतच त्यांनी परबांवर चंद्रग्रहणाच्या रात्री अघोरी कृत्य केल्याचा खळबळजनक आरोप केला.
काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 1993 साली खेड येथील त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी ज्योती कदम स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका उडाला. यात त्यांच्या साडीने पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या. “मी स्वतः माझ्या हातांनी तिला वाचवले. त्या आगीत माझे दोन्ही हातही भाजले गेले.
सहा महिने त्या मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत होत्या, आणि मीही त्यांच्यासोबत तिथेच होतो,” असे कदम यांनी भावूक होत सांगितले. ते पुढे म्हणाले, “आजही आम्ही सुखाने संसार करत आहोत. पण अनिल परब यांनी खोटे आरोप करुन माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. यासाठी मी त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.”
कदम यांनी अनिल परब यांच्या नार्को टेस्टच्या मागणीला प्रत्युत्तर देताना म्हटले, “मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. परब यांनी केलेले आरोप निराधार आहेत.”
अनिल परबांचे आरोप काय?
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करत 1993 च्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. परब म्हणाले होते, “ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले की त्यांना कोणीतरी पेटवले, याची सत्यता पडताळण्यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट व्हायला हवी.” याशिवाय, परब यांनी कदम यांच्यावर बंगले बांधून देण्याचे आणि राजकीय डावपेचांचेही आरोप केले. तसेच, कदम यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना त्यांच्या वडिलांच्या कथित उद्योगांची चौकशी करण्याचे आव्हान दिले.
कदमांचा पलटवार, परबांवर अघोरी कृत्याचा आरोप
रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर खळबळजनक पलटवार केला. ते म्हणाले, “अनिल परब हे वकील आणि सुशिक्षित व्यक्ती आहेत. पण वरळी कोळीवाड्यातील स्मशानभूमीत चंद्रग्रहणाच्या रात्री त्यांनी बकऱ्याचा बळी दिल्याची माहिती स्थानिकांनी मला दिली.
परब आणि एका बांधकाम व्यावसायिकासह दोन तांत्रिक स्मशानभूमीत आले होते. त्यांनी माझे आणि माझा मुलगा योगेश यांचे नाव घेऊन बकऱ्याचा बळी दिला, असे सांगितले जाते.” कदम यांनी याबाबत खात्रीशीर माहिती नसल्याचे स्पष्ट केले, परंतु असे कृत्य खरोखर झाले असेल तर ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.





