पुणे – महाराष्ट्राची शिक्षण परंपरा यथार्थपणे चालवणारे अग्रगण्य नाव म्हणजे, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीवजी जगताप. स्थापनेपासून केवळ वीस-पंचवीस वर्षांत गोरगरीबांच्या हक्काची शिक्षणसंस्था अशी अभिनव एज्युकेशन सोसायटीने नावलौकिक कमावला आहे.
राजीव जगताप यांच्यासाठी गुरूतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे हे आहेत. “इवलेसे रोप लावियेले द्वारी… तयाचा वेलु गेला गगनावरी’ या ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ओवीप्रमाणे अभिनव एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष विस्तारला आहे. त्यांच्या अनेक विद्याशाखा असलेल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आसून असंख्य विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगाराचा लाभ झाला आहे.
राजीव जगताप यांनी 2003 मध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे रोपटे लावले. 2005 मध्ये नऱ्हे येथे फार्मसी (डिप्लोमा) कॉलेज सुरू केले. तर सन 2007 हा “अभिनव’च्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यांनी नऱ्हे येथे फार्मसी (डिग्री), एमबीए आणि वडवाडी येथे पॉलिटेक्निक अशी तीन महाविद्यालये वर्षभरात सुरू केली. 2009 मध्ये वडवाडी येथे इंजिनिअरिंग कॉलेज आणि 2010 मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. अवघ्या 6 वर्षांत 19 इन्स्टिट्यूटपर्यंत “अभिनव’चा विस्तार केला. सद्यस्थितीत जगताप सरांसह त्यांच्या पत्नी सुनीताताई, बंधू संजय जगताप आणि मुलगा निर्मोही. पुतण्या ध्रुव हे संस्थेची पालखी पुढे नेत आहेत.
वास्तविक, “अभिनव’ हे जगताप सरांच्या वडिलांनी सुरू केलेल्या फोटो स्टुडिओचे नाव. हेच नाव शिक्षणसंस्थेसाठी वापरताना त्यांनी आधी वडिलांची परवानगी घेतली. तेथून पुण्यात त्यांनी “अभिनव’ हा शिक्षणक्षेत्रातील नवा “ब्रॅन्ड’ बनवला. “अभिनव एज्युकेशन सोसायटी’ हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य असेच वाढत रहावो, याच त्यांना आज जन्मदिनी हार्दिक शुभेच्छा..! – ऍड. दिलीप जगताप, संस्थापक अध्यक्ष, जनहित फाउंडेशन
“अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे शिक्षण ही मूलभूत गरज आहे. अगदी युद्धजन्य परिस्थितीतही शिक्षण संस्था सुरूच राहिल्या. परंतु, करोना काळ हा शिक्षण संस्थांसाठी साक्षात अग्निपरिक्षेचा काळ होता. या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची आतोनात हानी झाली. ती भरून काढण्याची सर्वस्वी जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर टाकणे अन्यायकारक ठरेल. शासनाने मिळकतकर, सवलत, आयकर सवलत यांसारख्या माध्यमांतून शैक्षणिक संस्थांना हातभार लावल्यास शैक्षणिक संस्थांना नक्कीच मदत होईल. शासनाने आमच्या आवाहनास प्रतिसाद दिल्यास ती जन्म दिवसाच्या निमित्ताने मला लाभलेली मोठी उपलब्धी असेल.” – राजीव जगताप, संस्थापक, अभिनव एज्युकेशन सोसायटी, आंबेगाव, पुणे