Pune Rural Police: बदली झालेल्या पोलिसांना कार्यमुक्त करा! ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पोलीस अधीक्षकांचा दणका
Pune Rural Police: पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून दिले कडक आदेश; संध्याकाळी ८ वाजेपर्यंत नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे फर्मान.

Pune Rural Police – पुणे ग्रामीण पोलीस दलातील बदलीचे आदेश होऊनही काही अधिकारी व कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याबाबत ‘दैनिक प्रभात’ने ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्ताची पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, बदली झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळी आठ वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून दिले आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील नियतकालिक बदल्यांचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले होते. मात्र, आदेश होऊनही काही अधिकारी व कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याने ‘बदलीचे आदेश कागदावरच राहणार का?’ असा सवाल उपस्थित झाला होता. याबाबत ‘दैनिक प्रभात’ने ‘बदलीचे आदेश कागदावरच; पोलीस कर्मचारी-अधिकार्यांना कार्यमुक्त कधी करणार?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
‘प्रभात’च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून संबंधित अधिकार्यांना स्पष्ट निर्देश देत बदली झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळी आठ वाजेपर्यंत जुन्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कार्यमुक्तीच्या प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. बदली आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बदलीचे आदेश काढल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचार्यांना वेळेत कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करणे आवश्यक असते; मात्र कार्यमुक्तीला विलंब होत असल्याने या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर ‘प्रभात’च्या वृत्तानंतर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने बदली प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
आदेशाची अंमलबजावणी महत्त्वाची
बदलीचे आदेश काढणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘आदेश निघाले, आता कार्यमुक्ती कधी?’ हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे बदली प्रक्रियेला आता अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






