पुणे – वैकुंठ स्मशानभूमीतून होणाऱ्या वायू प्रदूषणविरोधात नवी पेठ परिसरातील सोसायट्या सरसावल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरुपात सहा सोसायट्यांनी एकत्रितपणे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महत्त्वाचे पुरावे, बेकायदेशीर चिमणी, विषारी धूर, महापालिकेची दुटप्पी भूमिका, नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका हे मुद्दे ठळकपणे मांडले आहेत.
नवी पेठ भागातील आनंदबाग, सुंदरबन, फाटकबाग, प्रणव, द सत्संग आणि अनूपम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड येथील सेक्रेटरी आणि अध्यक्षांनी मिळून
ही याचिका दाखल केली आहे. पुणे महानगरपालिका, महापालिकेचा विद्युत विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य शासन आणि आरोग्य विभाग यांना प्रतिवादी केले आहे. ऍड. असीम सरोदे, अजिंक्य उडाणे, ऍड. अजित देशपांडे व ऍड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी याच परिसरातील रहिवासी विक्रांत लाटकर यांनीदेखील याचिका दाखल केली आहे. याविषयी याचिकाकर्ते सुमित सबनीस म्हणाले, “वैकुंठ स्मशानभूमीतील वाढत्या धुरामुळे आसपासच्या सोसायट्यांमधील सुमारे तीन हजार नागरिकांसह निवारा वृद्धाश्रमातील नागरिकांनाही त्रास होत आहे. स्मशानभूमीतील चिमणी आणि यंत्रणा जुन्या झाल्या आहेत. त्याची योग्य देखभाल-दुरुस्ती केली जात नाही.
यामुळे चिमणीमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत आहे. प्रदूषणावर नियंत्रण राहिलेले नाही. चिमणीची क्षमता जर संपुष्टात आली असेल तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे. प्रदूषणावर नियंत्रण यंत्रणा कार्यांन्वित केली पाहिजे. महापौरांच्या टीमने वैकुंठ स्मशानभूमीला भेट दिल्यानंतर अजून तीन मशिन्स इथे आणणार आहेत असे सांगितले. मात्र, वैकुंठातच का? असा आमचा प्रश्न आहे. पुण्यात 21 स्मशानभूमी आहेत. आधीच वैकुंठ स्मशानभूमीवर प्रचंड ताण आला आहे.’
जशी लोकसंख्या वाढत आहे, तशा स्मशानभूमीच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. ज्या स्मशानभूमींत विद्युत दाहिनी नाही, तिथे ही यंत्रणा कार्यान्वित करायला हवी. सर्व स्मशानभूमींमध्ये क्रमाक्रमाने शव अंत्यसंस्कारासाठी पाठवावीत म्हणजे एकाच स्मशानभूमीवर ताण येणार नाही. आम्हाला प्रदूषणमुक्त करा आणि वैकुंठ स्मशानभूमीवर ताण देऊ नका ही आमची मागणी आहे.
– सुमित सबनीस, नवी पेठ