100 दिवसांपासून आंदोलन सुरूच…एसटी आणि प्रवाशांतील “अंतर’ वाढले
कल्याणी फडके
पुणे – खेड्यापाड्यात पोहोचणारी, प्रवाशांच्या सोयीची सुविधा अशी ओळख असणाऱ्या एसटी आणि प्रवाशांतील “अंतर’ दिवसागणिक वाढतच आहेत. एसटीचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पुणे विभागात मंगळवारी 100 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, तरीदेखील तिढा पूर्णत: सुटला नसून, प्रवाशांची गैरसोय कायम आहे.
एसटी कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर अखेरपासून संप पुकारण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही दिवसांतच संप निवळला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा कर्मचारी संपावर गेले. सुरूवातीच्या काळात मुंडन आंदोलन, थाळीनाद आंदोलन, एसटीच्या कुटुंबीयांचे आंदोलन अशी एक ना अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. परंतु, निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे.
यावर कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली. संप मिटण्यासाठी निलंबन, सेवा समाप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला. मात्र, पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती, दौंड, शिरूर, तळेगाव, राजगुरूनगर, भोर, नारायणगाव, इंदापूर, सासवड, पिंपरी-चिंचवड, बारामती एमआयडीसी या 13 आगारांमध्ये 8 नोव्हेंबर रोजी सुरू झालेला संप 100 व्या दिवशीदेखील कायम आहे. त्यामुुळे सामान्य प्रवाशांची अडचण तर होत आहेच, शिवाय आर्थिक उत्पन्नही बुडाले आहे.
सुरुवातीला पाठिंबा दिला, आता नाराजी
गेले तीन महिने खासगी वाहनांसह जीप, व्हॅन, वडाप, रिक्षा या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी खासगी वाहने, मग पीएमपी असा वाहने बदलत प्रवास करावा लागत आहे. पर्यायाने खर्च देखील अधिक होत आहे. त्यामुळे सुरूवातीला संपाला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांकडून आता मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे तिकीट सवलतीच्या दरात आकारण्यात येते. मात्र, सध्या एसटीच नसल्याने वाढीव तिकीट मोजावे लागत आहे.
आगारांमध्ये दैनाच
संपाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांना परवानगी दिली होती. सध्या शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) या आगारांमध्ये खासगी चारचाकी वाहने, प्रवासी हलकी वाहने, बसेसच्या रांगा आहेत. दुसरीकडे एसटी आणि खासगी वाहनांबाबत प्रवाशांमधील गोंधळदेखील कायम आहे. बसेसचे वेळापत्रकदेखील निश्चित नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.
नागरिकांची परवड
लांब पल्ल्याच्या मार्गांवर काही अंशी बसेस धावत आहेत. मात्र, अद्यापही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात खासगी वाहतूक सुसाट सुरू आहे. हे वाहनचालक प्रवाशांकडून किरकोळ अंतरासाठी काही “शे’ रुपये आकारत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्गम खेड्यांपर्यंत बसेस धावतात. कमी लोकवस्त्यांच्या गावांमध्ये खासगी वाहने उपलब्ध नसल्याने नागरिक एसटीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची परवड होत आहे.
संप आणि अडचणी असा दुहेरी पेच
“आम्ही सुरुवातीला संपात सहभागी झालो. मात्र, काही दिवसानंतर आर्थिक अडचणी सुरू झाल्या. तर, संप सुद्धा आमच्यासाठीच आहे. विलीनीकरण झाल्यास आम्हालाच फायदा होईल. पण, परिवाराला देखील प्राधान्य दिले पाहिजे. संपावर असताना पगार नव्हता. खर्च भागवताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे कामावर हजर झालो,’ अशी भावना एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर “प्रभात’ला सांगितली.
सध्या राज्यभरात सुरू असणाऱ्या संप-आंदोलनरुपी दुखवट्यामध्ये केवळ एसटी महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. आता आम्हीदेखील न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही आमची मागणी आहे. मात्र निर्णय येईपर्यंत दुखवटा सुरूच राहणार आहे.
– राजेंद्र मेश्राम, स्वारगेट आगार
पुणे विभागातील विविध आगारांमध्ये कर्मचारी हजर होत असून, बसेसची संख्या वाढत आहे. भोर, इंदापूर, बारामती या आगारांमधील बसेस धावण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्या भागांतील काही गावांमध्ये बसेस धावत आहेत. जिल्ह्याच्या बाकी भागांमध्ये कर्मचारी हजर होतील, त्याप्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहेत.
– ज्ञानेश्वर रणवरे, वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग