पुणे – महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (दि. २७) जुन्नर येथून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, दि.30 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी या मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित शैक्षणिक कर्ज धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला आहे.