नगर – जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या देखील खोळंबल्या असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या स्थितीमध्ये झालेल्या पावसातून गवत व पेरण्याच्या माध्यमातून चारा उपलब्ध होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे चारा टंचाई जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता असून तातडीने जिल्ह्याबाहेर होणाऱ्या चारा वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पशुसंर्वधन विभागाने दिला आहे. येत्या आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर चारा वाहतूकीला बंदीचा निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात लहान, मोठे सर्व प्रकारचे एकूण 30 लाख 79 हजार 461 पशुधन आहे. त्यांना प्रति महिना 7 लाख 90 हजार 902 मे. टन चाऱ्याची आवश्यकता भासते. मागील वर्षी 76 लाख 13 हजार 920 मे.टन चार उत्पादन झाले आहे. मार्चपर्यंत 45 लाख 72 हजार 898 मे.टन चारा वापरात आला आहे. एप्रिल महिन्यात 30 लाख 41 हजार 22 मे.टन चारा शिल्लक होता. मात्र पाऊस लांबल्याने हा चार देखील संपत आला असून जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चाऱ्याचा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. ती बंदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत करावी असा प्रस्ताव पशुसंर्वधन विभागाने दिला आहे. त्याबरोबर लिलाव करण्यास देखील परवानगी देण्यात येऊन नये अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय मोठी जनावरे 13 लाख 23 हजार 543 आहे. त्यांना प्रतिदिन, प्रत्येकी 15 किलो चारा लागतो तर लहान जनावरांची संख्या 15 लाख 99 हजार 658 आहे त्यांना प्रतिदिन प्रत्येकी 7.5 किलो चाऱ्याची आवश्यकता भासते. शेळ्या-मेंढ्यांची संख्या 14 लाख 79 हजार 803 आहे. त्यांना प्रतिदिन प्रत्येकी 3 किलो चाऱ्याची आवश्यकता भासते.
चारा मुरघास व टिएमआर या सर्वांची वाहतूक बंदी करण्यात यावी. सध्या कमी अधिक झालेल्या पावसामुळे बांदावर व मोकळ्या जागेत गवत उगवत आहे. त्यापासून 13 ते 214 लाख मे.टन चार उपलब्ध होईल, जिल्ह्यात सध्या मुरघास मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. किमान 50 हजार मे.टन मुरघास शिल्लक आहे. तसेच वनविभागाकडून चार सुमारे 7 ते 8 मे.टन चार उपलब्ध होईल. परंतू तो होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत चारा वाहतूक बंदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सध्या 14 हजार हेकटर क्षेत्रावर मका पिक घेण्यात आला आहे. तर 18 हजार हेक्टरवर ऊसाचे पिक आहे. तो देखील चार म्हणून वापरता येणार आहे. त्याबरोबर कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व कोपरगाव येथील पशुपैदास केंद्राच्या ठिकाणी असलेल्या जागेत उपलब्ध पाण्याचा वापर करून चारा पिक घेण्याचा प्रस्ताव पशुसंर्वधन विभागाने दिला आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी देखील दाखविण्यात आली आहे.
जिल्ह्यात सहा तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न
पाण्याचा उद्भव नसलेल्या तालुक्यात सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यात पाथर्डी, शेवगावचा पूर्व भाग, नगर, श्रीगोंदा, कर्जत व पारनेर या तालुक्यातील काही भागात चारा टंचाई भासणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग सज्ज झाले असून या चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.