नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काही योजना विद्यूत देयक थकीत यासह अन्य कारणामुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधीत गावांना पाणी पुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे टंचाई आणि निवडणूका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यामुळे संबंधीत योजनांकडे काय अडचणी आहेत, या समोर येवून भविष्यात येणार्या अडचणी सोडवता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात 296 टँकरव्दारे 278 गावे आणि 1 हजार 500 वाड्या वस्त्यांवरील लोकांची पाण्याची तहान भागावण्यात येत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती बरी असली तरी काही वर्षापूर्वी यापेक्षा अधिक टँकर जिल्ह्यात सुरू होते. जिल्ह्यात काही भागात चारा टंचाई होणार असल्याचे पशूसंवर्धन विभागाचा अहवाल होता.
मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासनाने टँकर भरण्याचे बंद पडलेले पाण्याचे स्त्रोत कार्यान्वित करून घेतले आहे. यामुळे पाण्याचे टँकर वेळत भरण्यास मदत होत असून यामुळे पाण्याच्या नियोजित खेपा होण्यास मदत होत आहे.
यासह टंचाईवर मात करण्यासाठी 64 ठिकाणी विहीरी आणि कुपनलीका अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सध्यातरी पाण्याचा काटकसरीने वापर महत्वा आहे.
सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू असला तरी जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्यातील पाणी टंचाईकडे जाणीवपूर्वक लक्ष असून आठ दिवसांतून एकदा टंचाईबाबत आढावा घेण्यात येवून नागरिकांना पाणी आणि चारा उपलब्ध करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता, टंचाई आणि निवडणूका संपल्यावर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनांचा आरखडा तयार करण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
यात संबंधीत योजना किती गावांसाठी आहे, योजनेचे हस्तांतरण झाले की नाही. योजनेचे वीज बिलाची स्थिती यासह अन्य बाबींचा त्या आराखड्यात समावेश करण्यात करण्यात येणार आहे. जेणे करून संबंधीत पाणी योजना कशा प्रकारे सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात वन विभागात, जंगल असणार्या ठिकाणी वृक्ष लागवडीमुळे त्याठिकाणी असणारे पाण्याचे स्त्रोत ऐवढ्या उष्णते जिवंत आहे. यावरून वृक्ष लागवडीचे महत्व अधोरेखीत होत असून यासाठी वन विभागासोबत बैठक घेण्यात आली असून नागरिकांनी वृक्ष लागवडीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी व्यक्त केले.