भोपाळ: कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मार्गाने जाऊ नये त्यांना कॉंग्रेस मध्ये चांगले भवितव्य आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.
आज पीटीआयला दिलल्या मुलाखतीत ते बोलत होते. राजस्थानातील सरकारच्या विरोधात भाजपनेच कट केला आहे असा आरोपही त्यांनी केला.
आपण स्वता पायलट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन संपर्क होऊ शकला नाही. त्यांना आपण टेक्स्ट मेसजही पाठवला आहे पण त्यालाही त्यांनी उत्तर दिलेले नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
दिग्विजयसिंह म्हणाले की भाजप हा विश्वास ठेवावा असा पक्ष नाहीं. अन्य पक्षाचे जे नेते तिकडे गेले आहेत त्यांना हे कळून चुकले आहे. पायलट यांच्या बाजुला वय हा त्यांना अनुकुल मुद्दा आहे. त्यांना कॉंग्रेस मध्येच चांगले भवितव्य आहे, शिंदेंनी जी चुक केली ती चूक त्यांनी करू नये असेही ते म्हणाले.
मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. ते मला माझ्या मुलासारखे आहेत. पुर्वी ते माझ्या कॉलला त्वरीत उत्तर द्यायचे पण यावेळी मात्र त्यांनी सगळ्यांशीच संपर्क टाळला आहे असेही त्यांनी नमूद केले. राजकारणात महत्वाकांक्षा असणे वाईट नाही. पण ती बाळगताना पक्षनिष्ठा, विचासरणी आणि देशही महत्वाचा असतो तो सोडून नुसतीच महत्वाकांक्षा बाळगणे योग्य नाही असेही त्यांनी नमूद केले.
आता पायलट हे प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत असे मी ऐकतो आहे, पण त्यांनी ते करण्याची गरजच नाही. कारण कॉंग्रेसने आजवर त्यांना सर्व दिले आहे. त्यांना वयाच्या 26 व्या वर्षी खासदार केले. 32 व्या वर्षी त्यांना केंद्रीय मंत्री केले. 34 व्या वर्षी ते प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 38 व्या वर्षी त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. पक्षाने अजून त्यांना काय द्यायला हवे होते असा सवालही त्यांनी केला.