Neelam Gorhe: आमदार-खासदार पक्ष का सोडतात? डॉ. नीलम गोर्हे यांनी थेट ‘या’ पक्षाच्या अपयशावरच ठेवलं बोट
Neelam Gorhe: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला; 'उबाठा' गटातील संभाव्य फुटीच्या चर्चेवर डॉ. गोर्हे यांचे वक्तव्य.

Neelam Gorhe – खासदार, आमदार एखादा पक्ष सोडून जात असेल तर ते त्या पक्षाचे अपयश असते. लोक शिवसेनेकडे येत आहेत, याचाच अर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वास वाढत आहे. सूर्य कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो उगवतच असतो, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. राजगुरूनगर येथे श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शनासाठी आलेल्या डॉ. गोर्हे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उबाठा गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य गोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, दक्षता समितीच्या विजयाताई शिंदे, रेखाताई क्षोत्रीय, संगीता तनपुरे, दित्या फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी सातकर, राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, कार्यकर्ता, नेता आणि सामान्य माणूस स्वतःची सहनशीलतेची मर्यादा ठरवत असतो. अशा परिस्थितीत लोक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे येत आहेत. याचा अर्थ पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. सत्तेसाठी पदे आणि जागांच्या राजकारणामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला.
चुकीच्या प्रचाराचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्या पुढे म्हणाल्या, काँग्रेसने यापूर्वी अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये फूट पाडली. शेकाप, कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध छोट्या संघटनांवर त्याचा परिणाम झाला. 2001 ते 2014 या काळात शिवसेनेतही अनेक वेळा फूट पाडण्याचे प्रयत्न झाले होते.
‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत प्रतिक्रिया
‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाबाबत विचारले असता डॉ. गोर्हे म्हणाल्या, एखाद्या पक्षाला झुरळ, मच्छर किंवा डास अशी उपमा देणे योग्य नाही. सोशल मीडियावर अशा नावांची चर्चा होत असली तरी त्याबाबत काळच उत्तर देईल. महिलांबाबत या पक्षाची कोणतीही ठोस भूमिका दिसून येत नाही. महिलांना राजकारण समजत नाही, असे मानणे चुकीचे आहे. महिलांना कमी लेखणे योग्य नाही.
धरणग्रस्त आणि महिलांच्या प्रश्नांवर लक्ष
राज्यातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगताना डॉ. गोर्हे म्हणाल्या, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि अधिकार्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या आहेत. आवश्यक असल्यास पुनर्वसनासंदर्भातील कायद्यात बदल करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. महिलांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक असून महिला बचत गटांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली.






