नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाने पूर्ण शक्ती पणाला लावूनही महत्वाच्या शहरांवर ताबा मिळवता आला नाही. त्यांना अनपेक्षित अशा कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. यातच युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली.
महाराष्ट्र सरकारच्या राजकीय विरोधाचा बदला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन घेऊ नका. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधील दूतावासाची मदत मिळत नाही, त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला आहे, त्यांना शोधा आणि सुखरूप घरी परत आना मोदीजी.. pic.twitter.com/A79QPf9F5q
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 1, 2022
मात्र यादरम्यान,खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले आहे. यावरून आता विरोधकांनी मात्र सरकारने उशीरा हलचाली सुरु केल्याने विद्यार्थी अडकून पडल्याची टीका केली आहे. अशाचत आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याच विषयावरुन टीका करताना पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधलाय.
नाना पटोले म्हणाले,’आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या कुटूंबाला काय वेदना होत असतील हे ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना कळणार नाही.’
जेव्हा देशात कोरोनाचे संकट आले आणि लोकांना त्यांच्या घरी परतायचे होते, तेव्हा मोदी सरकारने लोकांचा विश्वास तोडला. आता युक्रेन युद्धाच्या संकटात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतायचे आहे, मोदी सरकारने त्यांचाही विश्वास तोडला आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 2, 2022
ते पुढे म्हणाले,’मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत स्वत: बोललो आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही अनेकदा कळवलं. जसं करोना कालावधीमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या आहे. देशाचे प्रधानसेवक प्रचारातच अडकले, त्यामुळे गंगा नदीत लोकांची प्रेतं पहायला मिळाली, मग ते जागे झाले.’
नाना पटोले यांनी ट्विट करूनही मोदी सरकारला टोला लगावला आहे. ”महाराष्ट्र सरकारच्या राजकीय विरोधाचा बदला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन घेऊ नका. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधील दूतावासाची मदत मिळत नाही, त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला आहे, त्यांना शोधा आणि सुखरूप घरी परत आना मोदीजी” अशी टीकाही पटोले यांनी केलीय.