Murali Vijay Emotional : मुरली विजयने ‘त्या’ कौटुंबिक वादानंतर पहिल्यांदाच जाहीर मंचावरून दिनेश कार्तिकबाबत केलं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO
Murali Vijay Emotional : माजी भारतीय सलामीवीर मुरली विजयने आपल्या भाषणादरम्यान दिनेश कार्तिकला एक भावनिक आदरांजली वाहिली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती.

Murali Vijay Emotional Tribute To Dinesh Karthik TNCA Annual Event : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि चर्चिलेल्या वैयक्तिक वादांपैकी एक असलेल्या मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्यातील कटुता आता अखेर संपल्याचे दिसत आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या (TNCA) वार्षिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचलेल्या माजी भारतीय सलामीवीर मुरली विजयने आपल्या भाषणादरम्यान दिनेश कार्तिकला एक भावनिक आदरांजली वाहिली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. विजयने जाहीर मंचावरून कार्तिकचे तोंडभरून कौतुक केले. अनेक वर्षांपासून एकमेकांकडे न पाहणाऱ्या या दोन खेळाडूंमधील जुनी कटू आठवण कायमची दफन करण्याचा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे.
कार्तिकला म्हणाला ‘अजीज दोस्त’; मानले आभार –
दिनेश कार्तिकचा उल्लेख करताना मुरली विजय कमालीचा भावुक झाला होता. तो म्हणाला, “आता मला दिनेश कार्तिकबद्दल बोलायचे आहे. कदाचित हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण मी त्याला लहानपणापासून पाहत आहे. कार्तिक हा तामिळनाडूच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महान यष्टीरक्षक-फलंदाज आहे. तो एक अतिशय गतिमान व्यक्तिमत्त्वाचा मालक आणि माझा अत्यंत जवळचा मित्र (अजीज दोस्त) आहे. मी नॉन-स्ट्रायकर एंडला उभा राहून एक चाहता म्हणून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. त्याच्या ज्ञानाने आणि अनुभवाने मला माझ्या कारकिर्दीत खूप मदत केली, ज्यासाठी मी मंचावरून त्याचे मनापासून आभार मानतो.”
Murali Vijay turned emotional at TNCA Annual Day:
“It might sound weird, but I’ve known Dinesh Karthik since childhood.
— A dynamic personality, great friend & helped me a lot.”This comes years after Vijay married Karthik’s ex-wife Nikita following their affair pic.twitter.com/LS7Ckoy3Wm
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) July 5, 2026
नेमका काय होता या दोन मित्रांमधील वाद?
दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यातील हा वाद २०१० च्या दशकातील सुरुवातीचा आहे. दोघेही तामिळनाडू आणि भारतीय संघाकडून एकत्र खेळायचे आणि पक्के मित्र होते. दिनेश कार्तिकचे लग्न त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी झाले होते. मात्र, निकिता आणि मुरली विजय यांच्यात जवळीक वाढल्याने कार्तिक आणि निकिता यांच्या नात्यात दुरावा आला. पुढे दोघांचा घटस्फोट झाला आणि निकिताने मुरली विजयशी लग्न केले. या घटनेमुळे दोन्ही क्रिकेटर्सच्या वैयक्तिक नात्यात मोठी दरी निर्माण झाली होती. त्यांनी जाहीरपणे कधीही एकमेकांवर चिखलफेक केली नाही, पण एकमेकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते.
कार्तिकने आयुष्यात केली शानदार वापसी –
या मोठ्या धक्क्यानंतर दिनेश कार्तिकने आपल्या आयुष्याची घडी उत्तम बसवली. २०१५ मध्ये त्याने भारताची स्टार स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलशी विवाह केला. क्रिकेटच्या मैदानात त्याने एक खतरनाक फिनिशर म्हणून पुनरागमन केले. सध्या तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा प्रशिक्षक असून जगातील एक नामांकित क्रिकेट कॉमेंटेटर आहे. अशात मुरली विजयच्या या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण केली आहे.





