IND vs PAK : पावसाच्या खेळात भारताचा रोमांचक विजय! पाकिस्तानला अवध्या २ धावांनी लोळवले

भारताची पाकिस्तानवर २ धावांनी मात!
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत एकाच गटात आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि भरत चिप्ली यांच्या जोडीने १५ चेंडूत ४२ धावांची दमदार सलामी दिली.
रॉबिन उथप्पाने २ चौकार आणि ३ षटकारांसह २८ धावांची खेळी केली. भरत चिप्लीने २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या, तर कर्णधार दिनेश कार्तिकने २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या. या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ६ षटकांत ४ गडी गमावून ८६ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ८७ धावांचे आव्हान ठेवले.
डकवर्थ लुईस नियमानुसार लागला निकाल –
प्रत्युत्तरात ८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात करत १ गडी गमावत ४१ धावापर्यंत मजल मारली होती, इतक्यात पावसाने हजेरी लावली. पाऊस थांबत नसल्याने सामना थांबवण्यात आला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) सामन्याचा निकाल लावण्यात आला. या नियमानुसार, भारतीय संघ ३ षटकांच्या खेळानंतर २ धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.
हेही वाचा – Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलच्या धमाकेदार शतकी खेळीनं वेधलं सर्वांच लक्ष! नाबाद राहत सावरला संघाचा डाव
गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याची संधी –
या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना कुवैत विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची भारतीय संघाला संधी आहे. सध्या पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.





