Mumbai: पवईत लहान मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार; सर्व मुलांची सुटका, सर्व घटनाक्रम…

मुंबई: राजधानी मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीने शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना आज घडली. पवई येथील आरए स्टुडिओत ऑडिशनसाठी आलेल्या १७ लहान मुलांसह दोन पालकांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य (Rescue Operation) सुरू केले.
चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू –
मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही क्रॉस गोळीबार केला. या गोळीबारात आरोपी रोहित आर्य जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय आहे नेमके प्रकरण?
पवई येथील आरए स्टुडिओ (RA Studio) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळकरी मुले गेल्या ४-५ दिवसांपासून येथील स्टुडिओत प्रशिक्षणासाठी येत होती. ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना बोलावण्यात आले होते. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारच्या जेवणासाठी सोडल्यानंतर रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने त्यांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेल्यांमध्ये १५ वर्षांखालील १७ मुले-मुली आणि दोन पालकांचा समावेश होता.
आरोपीने व्हिडिओतून संवाद साधला –
आरोपी रोहित आर्यने एक व्हिडिओ जारी केला. “मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवले आहे,” असे त्याने व्हिडिओत म्हटले. त्याला काही लोकांशी संवाद साधायचा असून त्यांना प्रश्न विचारायचे असल्याचे त्याने सांगितले.
प्रकल्पात झालेल्या नुकसानीतून कृत्य?
रोहित आर्यने आपण पैसे किंवा हिंसाचाराची मागणी करत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, शिक्षण विभागासाठी त्याने ‘स्वच्छता मॉनिटर’ नावाचा एक प्रकल्प कर्जावर (Loan) केला होता. या प्रकल्पाचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत आणि त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या आर्थिक नुकसानीकडे आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचे यशस्वी बचावकार्य –
दुपारी पावणे दोन वाजता पोलिसांना कॉल आला. त्यानंतर तात्काळ स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स (QAF) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून खोलीत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने सर्व १९ जणांची (१७ मुले, १ प्रौढ, १ स्थानिक) सुखरूप सुटका करण्यात आली. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान एक ज्येष्ठ नागरिक महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाली.
दरम्यान, मुलांची सुटका झाल्यानंतर त्यांना आणि पालकांना पवई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. मुले घाबरलेली असली तरी सुरक्षित आहेत, असे पालकांनी सांगितले.





