Mulshi News: मुळशी धरणग्रस्त आक्रमक! अमित कंधारे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष; नागरिकांचा रास्ता रोको
Mulshi News: टाटा ट्रस्टकडून आरोग्य-शिक्षण सुविधा आणि २ टीएमसी पाण्याची मागणी; तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा.

Mulshi News – मुळशी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमित कंधारे यांचे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र, आंदोलनाची अद्याप दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त मुळशीकरांनी पौड येथे पुणे-कोलाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
मुळशी धरणाच्या निर्मितीवेळी औद्योगिक विकासासाठी धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी, घरे आणि उपजीविकेची साधने गमावली. मात्र, अनेक वर्षांनंतरही पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, गावठाण, रस्ते, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. धरणग्रस्त समितीच्या वतीने शासन तसेच टाटा कंपनीकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
मुळशीकरांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता वाढीव दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, डोंगरवाडी व आदरवाडी गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा द्यावी, शेतरस्त्यांना परवानगी द्यावी आणि गावठाणांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा मागण्या आहेत. तसेच घरदुरुस्ती व घरविस्तारासाठी परवानगी देणे, धरणग्रस्त युवकांना टाटा कंपनीत रोजगार उपलब्ध करून देणे, कातकरी समाजबांधवांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून देणे,
तसेच सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थी व रुग्णांना आर्थिक मदत मिळावी, लाँच मार्गावरील रस्त्यांची कामे करावीत, माले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी अनुदान द्यावे, मुळशी प्रादेशिक पाणी योजनेसाठी धरणातील पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्यावी, तसेच वळणे येथे पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही धरणग्रस्त समितीने केल्या आहेत.
आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
9 ऑगस्टपासून अमित कंधारे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धरणग्रस्तांनी व्यक्त केला आहे. टाटा कंपनीने या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त करत टाटा कंपनीच्या उपकेंद्राबाबत आक्रमक वक्तव्ये केली. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेऊन आंदोलकांशी संवाद साधत प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.






