पुणे -आळंदी-देहूतून निघालेला पंढरीच्या वारीचा सोहळ्याचे 12 जूनला पुण्यात आगमन झाले होते. 14 जूनला येथून पंढरीकडे निघालेला हा सोहळा 29 जूनला आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन 3 जुलैला माघारी निघाला. आज बरोबर एक महिन्याने दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन झाले असून, उद्या (दि. 12) सकाळी या पालख्यां देहू-आळंदीकडे मार्गस्थ होणार आहेत.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात सकाळी 6.30च्या दरम्यान आगमन झाले. यावेळी येथील वातावरण भक्मिमय आणि चैतन्यमय झाले आहे. पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. पालखी मंदिरात विसावल्यावर येथे समाज आरती करण्यात आली. दिवसभर भाविकांनी येथे माऊलींच्या चैतन्य पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
आज (दि. 12) सकाळी 10 वाजता माऊलींचा पालखीरथ सकाळी 10 वाजता आळंदीकडे मार्गस्थ होईल. गुरुवारी (दि. 13) एकादशी आहे आणि हा माऊलींचा वार असल्याने आळंदीत चैतन्याचे वातावरण राहील. पादुकांचे स्वागत, ग्रामप्रदक्षिणा, आणि मानाच्या दिंडीकरांना हजेरी मारुतीजवळ श्रीफळ देऊन सत्कार केल्यावर सोहळा समाप्त होणार आहे.