– माधव विद्वांस
नाट्य व चित्रपट अभिनेते, नाट्यनिर्माते, नटवर्य चिंतामणराव गणेश कोल्हटकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 12 मार्च 1891 रोजी सातारा येथे झाला. कोल्हटकर कुटुंबीय मूळचे गणपतीपुळे जवळील नेवरे येथील. कोल्हटकर कुटुंबियापैकी काही कुटुंबे वाई, सातारा, अमरावती तसेच नागपूरकर भोसल्यांचे प्रतिनिधी म्हणून कोलकातापर्यंत पोचली होती.त्यांचे वडील हे सातारा येथे एका छापखान्याचे आणि महाराष्ट्र मित्र या वृत्तपत्राचे मालक, लेखक आणि वक्ते होते. चिंतामण सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
त्यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. वर्ष 1907 मध्ये सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून रंगभूमीवर पदार्पण केले. नंतर 1910 मध्ये सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या संमेलनात झालेल्या ‘झुंझारराव’ या नाटकात झुंझाररावाची भूमिका केली. त्यांनी 1911 मध्ये रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकले ते महाराष्ट्र नाटक मंडळीत. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पुढे भारत नाटक मंडळी आणि किर्लोस्कर नाटक मंडळीतही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. तेथेच त्यांनी उर्दू आणि हिंदी नाटकेही रंगभूमीवर आणली.
वर्ष 1918मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्या भागीदारीत बलवंत नाटक मंडळी काढली. या मंडळीत तालीम मास्तर (दिग्दर्शक) हे त्यांचे महत्त्वाचे काम होते. चिंतामणरावांच्या भूमिका असलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन ही नाटके खूपच गाजली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‘रामराज्य वियोग’ आणि राम गणेश गडकरी यांचे ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन्ही अपूर्ण नाटके त्यांनी पूर्ण केली. वर्ष 1933च्या सुमारास चित्रपटाकडे आकर्षित होऊ लागले. बदलते वारे पाहून चिंतामणरावारनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्चर्समध्ये रूपांतर केले. पण या व्यवसायात प्रचंड तोटा झाला.
कोर्टकचेर्या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पचविले तसेच आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागले. पण या संकटाचा त्यांनी धैर्याने मुकाबला केला व परत नाटकाकडे वळले व राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला. कालांतराने ते मो. ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु. ल. देशपांडे यांची ओळख रसिकांना करून दिली. एकूण 16 चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या.
वर्ष 1946 मध्ये अहमदनगर येथे झालेल्या 35व्या आणि वर्ष 1949 मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या 36व्या नाट्यसंमेलनांचे ते अध्यक्ष होते. त्यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले. चिंतामणराव यांनी लिहिलेल्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रास साहित्य अकादमीने 1958 साली पारितोषिक देऊन गौरवले. 23 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र चित्तरंजन कोल्हटकर हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणरावांची नात मिरज येथील डॉ. विनीता करमरकर यांनी ‘बलवंत चिंतामणी’ या नावाचे चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे.