कराची -पाकिस्तान क्रिकेट मंडळाला येत्या काळात होत असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, काही कारणामुळे जर हे यजमानपद आमच्या हातातून गेले तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, अशी भीती मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी व्यक्त केली आहे.
ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होत असून त्यात भारतीय संघ सहभागी होणार नसल्याने या स्पर्धेतील भारताचे सामने अन्यत्र हलवले जाण्याची शक्यता बळावली आहे. तसेच याला आशिया क्रिकेट समितीनेही दुजोरा दिला आहे. मात्र, या सर्व वादात तसेच पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थिती व निर्माण झालेल्या महागाई आणि आराजकतेमुळे हे यजमानपदही त्यांच्या हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय तणाव आहे.
त्यामुळे भारतातील केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात या स्पर्धेत सहभागी होऊन खेळण्याची परवानगी दिलेली नाही. या परिस्थितीत जर भारतीय संघ येथे येऊन सामने खेळला नाही व त्यांचे सामने अन्य देशांत हलवले गेले तर अन्य देशही हीच मागणी करतील व सुरक्षेचा मुद्दा पुढे करतील. त्यावेळी आशिया क्रिकेट समितीने जर हा मुद्दा महत्त्वाचा ठरवत यजमानपदही काढून घेतले तर पाक मंडळाला जवळपास 30 लाख डॉलर्सचे नुकसान होणार आहे, असेही सेठी म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय संबंधात तणाव असून बीसीसीआयने आमचा संघ पाकिस्तानमध्ये कोणत्याही परिस्थितीत खेळायला जाणार नाही, असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यावेळी पाक मंडळानेही उलट धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय संघ आशिया करंडक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर आमचा संघही भारतात होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येणार नाही. मात्र, तरीही बीसीसीआयची भूमिका बदलली नाही व अखेर पाक मंडळालाच नमते घ्यावे लागले आहे.
भारतात एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. याबाबत आता एक पाऊल मागे घेत पाक मंडळाने सांगितले आहे की, भारताला आमच्या देशात क्रिकेट खेळण्यास इच्छा नसेल तर भारताने आशियाई स्पर्धेमधील त्यांचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळावेत आणि बाकीचे सामने पाकिस्तानमध्येच खेळवण्यात यावेत.