भुवनेश्वर – करोनामुळे मागीस सुमारे दीड वर्षांच्या कालावधीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची सवयच राहिलेली नाही. त्यामुळे आता काही भागांमध्ये ऑफलाइन शिक्षण जरी सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची इच्छा कमी झाली आहे. त्यामुळे शाळेत न जाण्यासाठी युक्त्या-प्रयुक्त्या योजल्या जात आहेत.
याबाबत एक अतिरेकी घटना ओरिसात समोर आली आहे. केवळ शाळेत जायला लागू नये आणि शाळेला सुट्टी मिळावी या हेतूने एका विद्यार्थ्यांने आपल्या तब्बल 20 मित्रांवर विषप्रयोग केला. या वीस मित्रांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये त्याने कीटकनाशक मिसळले राजधानी भुवनेश्वर मधील बाटली ब्लॉक या प्रदेशातील अकरावी आणि बारावीतील वीस विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीसाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्याने हॉस्टेलमधील या सर्व विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये कीटकनाशक मिसळले असल्याची माहिती शाळेच्या प्रशासनाने दिली आहे. या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुलांसाठी असलेला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
या शाळेचे शिक्षक रवि नारायण साहू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे निश्चित किती विद्यार्थ्यांच्या पाण्यामध्ये या विद्यार्थ्याने कीटकनाशक मिसळले आहे हे अद्याप समोर आले नसले तरी सर्व विद्यार्थ्यांच्या पाण्याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक नाही. करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले जात असतानाच आणि शैक्षणिक व्यवहार सुरू होत असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने ओडिसामध्ये खळबळ माजली आहे.