Matheran News – माथेरानमध्ये सुरू असलेल्या ई-रिक्षा संपाचा आज चौथा दिवस असून, या पार्श्वभूमीवर ई-रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळाची तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार सुरेंद्र सिंग ठाकूर तसेच मुख्याधिकारी राहुल इंगळे उपस्थित होते. बैठकीत शासनाची भूमिका संघटनेसमोर स्पष्ट करण्यात आली असून रिक्षाधारकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तहसील प्रशासनाच्या वतीने ई-रिक्षा संघटनेला संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधित परवानग्या व प्रक्रियेबाबत निर्णयासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी देण्याची विनंती करण्यात आली असून या कालावधीत मॉनिटरिंग कमिटीची तातडीने बैठक घेऊन रिक्षाधारकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने रिक्षा वितरणाचा मुद्दाही चर्चेत आला. दरम्यान, संपामुळे मागील काही दिवसांपासून रिक्षा सेवा ठप्प असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमध्ये वाहतूक सेवा बंद राहिल्याने सोशल मीडियावरही विविध चर्चांना उधाण आले होते. बैठकीनंतर ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले की, “तहसील कार्यालयात सकारात्मक चर्चा झाली. आज रात्री संघटनेची बैठक घेऊन शासनाच्या सूचनांवर सविस्तर चर्चा केली जाईल आणि माथेरानच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल.”