मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांनी गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यातील विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर येथे मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या दोन दिवसांत राज्यात घडलेल्या हिंसाचाराची राज्यातील 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.
रजनीश शेठ म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने शांततेत पार पडली आहेत. परंतु काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आंदोलकांकडून कायद्याचे उल्लंघन व काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही आरोपींना अटक देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 307 कलमाखाली 7 गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्रामध्ये 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 141 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 168 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, 146 आरोपींना सीआरपीसी 41 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.