मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच धक्कादायक आरोप केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुर सुरू झाल्याची चर्चा होती. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने पटोले यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सामील असलेल्या दोन पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं चित्र आहे.
नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावे, असं नवाब मलिक म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता.
कोणतही सरकार सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवत असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी, अस नवाब मलिक यांनी म्हटलं.