Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचा कहर..! मुंबई-ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, पुढील तीन दिवस (२१ ते २३ जुलै) राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबईत पावसाचा कहर, वाहतूक ठप्प
मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी आणि साकीनाका मेट्रो परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने चाकरमान्यांना प्रवासात मोठी कसरत करावी लागत आहे. पश्चिम रेल्वेवरील फास्ट लोकल गाड्या १०-१२ मिनिटे उशिराने धावत असून, प्रवाशांचा खोळंबा वाढला आहे.
अंधेरी सबवे बंद, महामार्गावर कोंडी
पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासंतास अडकून राहावे लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून, पाणी उपसण्यासाठी पंपांचा वापर सुरू आहे, पण पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आव्हानात्मक आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि संपूर्ण विदर्भ (अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली). या भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर, सातारा, आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर २१ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता.
रेड अलर्ट : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना २२ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा. पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
IMD ने नागरिकांना अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः सखल भागात राहणाऱ्या रहिवाशांना पूर आणि पाणी साचण्याच्या धोक्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह ५०-६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने किनारी भागात मासेमारी आणि समुद्रकिनारी पर्यटन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





