जयंत कुलकर्णी
नगर, दि. 21 -विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नव्याने शैक्षणिक धोरण आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मात्र,हे उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभागात अधिकारी व कर्मचारी अपुरे पडत आहेत. विशेष म्हणजे शाळांचा दर्जा उंचविण्याबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने जिल्ह्यात शिक्षण विभागाचा खेळखंडोबा झाला आहे.
वास्तविक, दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असताना गेल्या काही महिन्यांपासून रिक्त पदे भरण्याबाबत शासनाची उदासीनता दिसून आली आहे.
त्यामुळे या विभागांवर कामाचा ताण येत आहे. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अनेक पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे 15 जूनपूर्वी भरल्यास नवीन शैक्षणिक वर्षात तरी शिक्षण विभागावरील कामाचा ताण कमी येऊ शकतो. जिल्हा परिषदेमार्फत रिक्त पदांबाबत वारंवार शासनाला माहिती कळवली जाते. तरीही शासनाची त्याकडे डोळेझाक होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये यंदा विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 25 हजाराने वाढली आहे. अशावेळी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर होत आहे. 809 प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सन 2010 पासून प्राथमिक शिक्षकांची भरती झाली नाही. त्यात 413 प्राथमिक शिक्षक तर 396 पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे.
प्राथमिक शिक्षकांची भरती गेल्या 12 वर्षांपासून बंद असल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. शिक्षकांच्या रिक्त पद आहे असे नाही तर शिक्षण विभागातील अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा गाडा चालविणे शिक्षणाधिकार्यांच्या दृष्टीने कसरत होत आहे. प्राथमिक शिक्षक व अधिकारी अशी 1041 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपशिक्षणाधिकारी 2, वर्ग दोनचे अधीक्षक 1, शालेय पोषण आहार विभागाच्या अधीक्षकांची 9, गटशिक्षणाधिकारी 6, सांख्यिकी सहायक 1 असे अशी पदे रिक्त आहेत.
शालेयस्तरावर काम करणार्या 82 विस्तार अधिकार्यांपैकी 11 पदे रिक्त आहेत, केंद्रप्रमुखांची 246 पैकी 211 पदे रिक्त, मुख्याध्यापकांची 466 पैकी 10, पदवीधर शिक्षकांच्या 1हजार 192 पैकी 396 पदे रिक्त आहेत तर उपाध्यापकाची 10 हजार 040 पैकी 413 पदे रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाकडे 12 हजार 26 पदे मंजूर आहेत. त्यातील 10 हजार 985 पदे भरली आहेत तर 1 हजार 40 पदे रिक्त आहेत.
विद्यार्थी संख्या वाढली; पण शिक्षक कमी
जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित होत असून विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यंदा 25 हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर मागील वर्षी 15 हजाराने वाढली मात्र शिक्षकांची संख्या ती असून त्यात तब्बल 800 वर पदे रिक्त आहेत.
पदोन्नतीमुळे पदे रिक्त
शिक्षण विभागाने 187 मुख्याध्यापक व 36 विस्तार अधिकार्यांना पदोन्नती दिली. त्यात दि. 31 मे रोजी 120 प्राथमिक शिक्षक निवृत्त झाले. त्याचाही परिणाम उपाध्यपकांचे संख्याबळ कमी होण्यावर झाला. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने महिन्यापूर्वी 87 प्राथमिक शिक्षक जिल्ह्यात हजर झाले. या सर्वांचा विचार केला तरी शिक्षकांची संख्या कमीच आहे.