नवी दिल्ली – इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद देशासाठी मौल्यवान ठरली आहे. ही परिषद उर्वरीत जगासाठीही महत्त्वपूर्ण ठरली. आपण एआयच्या मदतीने प्राचीन ग्रंथ आणि ज्ञान कसे जतन करत आहोत हे पाहून जागतिक नेते आश्चर्यचकित झाले. एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतील जागतिक नेते प्राण्यांवर उपचार करण्यात आणि शेतकऱ्यांना २४ तास मदत करण्यात एआयने केलेल्या अभूतपूर्व प्रगतीने प्रभावित झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्र्म मन की बातच्या १३१ व्या भागात केली. मोदी म्हणाले की, २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सव साजरा केला जाईल. देश गुलामगिरीच्या प्रतीकांच्या पलीकडे गेला आहे आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित गोष्टींना महत्त्व देऊ लागला आहे. राष्ट्रपती भवनाने देखील या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रसंगी राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती प्रांगणात सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाईल. ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. सत्तेला पद म्हणून नव्हे तर सेवा म्हणून पाहणाऱ्यांपैकी ते होते. त्यांचे आचरण, आत्मसंयम आणि सार्वजनिक जीवनात स्वतंत्र विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. मोदी म्हणाले की, केरळमधील भरतप्पुझा नदीच्या काठावर, तिरुनावाया येथे शतकानुशतके जुनी परंपरा आहे. बरेच लोक याला महा माघ महोत्सव किंवा केरळ कुंभ असेही म्हणतात. माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान करणे आणि त्या क्षणाला आयुष्यभरासाठी अमिट आठवण बनवणे हा त्याचा आत्मा आहे. कालांतराने ही परंपरा क्षीण होत चालली आहे. जवळजवळ अडीचशे वर्षांपासून हा कार्यक्रम पूर्वीसारख्या भव्यतेने साजरा केला जात नव्हता. परंतु आज, आपल्या देशात, जो आपला वारसा पुन्हा ओळखत आहे, इतिहासाने आणखी एक वळण घेतले आहे. मोदी म्हणाले की, महा कुंभ असो किंवा केरळ कुंभ, हा केवळ स्नानाचा उत्सव नाही. तो स्मृती जागृत करण्याचा उत्सव आहे. तो संस्कृतीचा पुनर्जन्म आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे, नद्या वेगवेगळ्या असू शकतात, किनारे वेगवेगळे असू शकतात, परंतु श्रद्धेचा प्रवाह एकच आहे आणि हा भारत आहे. अलिन शेरीन अब्राहमचाही उल्लेख : मोदींनी केरळमधील निर्दोष अलिन शेरीन अब्राहमचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आपण केरळमधील अलिन शेरीन अब्राहम या निष्पाप मुलीला गमावले. ती अवघ्या १० महिन्यांची असतानाच निधन पावली. तिच्यापुढे एक संपूर्ण आयुष्य होते, जे अचानक संपले. इतकी स्वप्ने आणि आनंद अपूर्ण राहिले. तिच्या पालकांना ज्या वेदना होत असतील त्या शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. इतक्या तीव्र वेदनांमध्येही, अलिनचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरीन यांनी असा निर्णय घेतला जो प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आदर भरून जातो. त्यांनी अलिनचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. हा एकच निर्णय त्यांच्या विचारसरणीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा किती व्यापकपणा दर्शवितो.