Eknath Shinde : घातपाताचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना थेट सवाल! “विद्यार्थ्यांच्या खांद्यावर…”
Eknath Shinde : या ठिय्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

Eknath Shinde : “ज्या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, त्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते? पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाबत काही घातपाताचा कट होता का?” असा थेट सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला.
कॅाकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाची धग आता देशभरात पसरली आहे. महाराष्ट्रात देखील प्रमुख शहरांमध्ये तरुणांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या ठिय्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
“जिथे कोणालाही आंदोलन करता येत नाही, त्या ठिकाणी लोकांना बोलावणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा प्रयत्न होता,” असा गंभीर आरोप एकनाथ शिंदेंनी केला.
विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला
नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना दुर्दैवी असल्याचे मान्य करतानाच केंद्र सरकारने त्यानंतर तातडीने कठोर पावले उचलल्याचे एकनाथ शिंदे यांनी आवर्जून नमूद केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने स्वतः या प्रक्रियेकडे लक्ष देत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले, मात्र विरोधकांनी त्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न केला.” अशा शब्दांत विरोधकांना फटकारलं.
काँग्रेस- भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप
दिल्लीत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर आता दोन्ही पक्षांकडून निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींवर केलेल्या कारवाईचा निषेध केला जात आहे. तर भाजपकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या ठिय्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेस भाजपमध्ये आरोप प्रत्योरोपाचे राजकारण सुरू झाले आहे.
Khushboo Patani: दिशा पाटनीची बहीण आंदोलनात उतरली; जंतर-मंतरवरील परिस्थितीबाबत केला मोठा खुलासा





