TOP 10 NEWS : पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय ते अभिजीत दिपके जंतर-मंतर मैदान सोडणार…; वाचा TOP 10 न्युज…
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली गेल्या जवळपास महिनाभरापासून नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे.

TOP 10 NEWS :
1 – जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठा धक्का.! अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली गेल्या जवळपास महिनाभरापासून नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजीत दिपके २० जूनपासून आंदोलनात सहभागी आहेत.
मात्र, आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ताप आणि शरीरात मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने दिपके यांनी जंतर-मंतर मैदान सोडले आहे.
एक्सवर पोस्ट करत त्यांनी आंदोलकांची माफी मागितली असून, काही दिवसांपासून पेनकिलर घेऊन आंदोलन करत असल्याचे सांगितले. आरामाची गरज असल्याने काही काळ आंदोलनापासून दूर राहणार असून, प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2 – पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय; दोषींच्या शिक्षेसाठी फास्ट-ट्रॅक कोर्टची घोषणा
नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांचे भविष्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पेपरफुटीप्रकरणी दोषींना जलद शिक्षा देण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणाला पंतप्रधानांनी ‘घोर पाप’ संबोधत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच असून, सरकारने संसदेत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.
3 – राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना भडकवले.! भाजपचा थेट आरोप
कॉकरोच जनता पार्टीच्या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून दिल्ली भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली भाजप अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, सीजेपीचे राजकीय कनेक्शन आता उघड झाले असून, विरोधक विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या भविष्याशी राजकारण करत आहेत.
केंद्र सरकारने पेपर लीक प्रकरणात कारवाई करून आरोपींना अटक केली, सुधारणा केल्या आणि फेरपरीक्षाही घेतली, असा दावा त्यांनी केला. दिल्लीचे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनीही मोदी सरकारने पेपरफुटीविरोधात ठोस पावले उचलल्याचे सांगितले.
4 – युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची पुन्हा मध्यस्थी? रुबिओ-लावरोव्ह भेटीकडे जगाचं लक्ष
मनिला येथे आसियान परिषदेदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या संभाव्य मध्यस्थीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
इराणमधील वाढता संघर्ष आणि रशिया-युक्रेनमधील थंडावलेल्या वाटाघाटींमुळे शांतता प्रयत्नांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, संधी मिळाल्यास अमेरिका शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे रुबिओ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुबिओ यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही स्वतंत्र चर्चा केली. दक्षिण चीन समुद्रातील वाढता तणाव आणि अमेरिका-चीन संबंधांवरही बैठकीत चर्चा झाली.
5 – फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी !
फ्रान्सने १५ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे. युरोपियन युनियनमधील अशा प्रकारची सर्वसमावेशक बंदी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला आहे. फ्रान्सच्या संसदेने हा प्रस्ताव २७९ विरुद्ध ८१ मतांनी मंजूर केला.
फ्रान्सच्या डिजिटल व्यवहार मंत्री अॅन ले हेनान्फ म्हणाल्या, वय पडताळणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांची असेल. या कायद्यात शैक्षणिक वेबसाइटस्, ऑनलाईन विश्वकोश आणि वैज्ञानिक प्लॅटफॉर्मना सूट दिली आहे.
सरकारला हा कायदा १ सप्टेंबरपासून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करायचा आहे. सप्टेंबरपासून १५ वर्षांखालील मुलांना नवीन खाती उघडता येणार नाहीत, तर आधीपासून असलेली खाती जानेवारी २०२७ पासून बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
6 – मुंबई-पुण्यात ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; पहिल्या 1.5 किमीचे भाडे 31 रुपये
महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळावर या सेवेचे लोकार्पण होणार आहे.
एका मोबाईल अॅपवरून कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी बुक करता येणार असून, प्रवासी आणि चालक थेट जोडले जाणार आहेत. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात ही सेवा सुरू होणार असून, परवडणारी आणि पारदर्शक वाहतूक व्यवस्था देण्याचा सरकारचा दावा आहे.
7 – राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडावा, संसदेत चर्चा करावी; फडणवीसांचं ओपन चॅलेंज
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि विरोधक मोदी सरकारला घेरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे.
“राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडावा आणि संसदेत चर्चेला सामोरं जावं. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर नाही, तर संसदेत घेतले जातात. प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर संसदेत मागा आणि तुमच्याकडे उपाययोजना असतील, तर सरकारला त्या स्वीकारण्यास भाग पाडा,” असं फडणवीस म्हणाले.
8 – रेंज रोव्हरची पहिली ‘GT’ इलेक्ट्रीक कार बाजारात; लक्झरी आणि वेगाचा जबरदस्त संगम!
लक्झरी कार निर्माता रेंज रोव्हरने जागतिक बाजारपेठेत आपल्या नव्या ‘रेंज रोव्हर जीटी’चा पहिला लूक सादर केला आहे. ही कंपनीची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक रेंज रोव्हर कार असणार आहे.
पारंपरिक एसयूव्हीपेक्षा कमी उंचीची आणि लांब ग्रँड टूरर डिझाइन असलेली ही कार स्पोर्टी लूकसह सादर करण्यात आली आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार होणारी ही कार उत्कृष्ट कामगिरी आणि ऑल-टेरेन क्षमतेसह येणार आहे.
कारच्या इंटिरियरमध्ये मिनिमलिस्टिक डॅशबोर्ड, मोठी स्क्रीन, स्वतंत्र ड्रायव्हर डिस्प्ले आणि मागील प्रवाशांसाठी भरपूर लेगरूम देण्यात आला आहे. मात्र, कंपनीने अद्याप बॅटरीचा आकार, रेंज, चार्जिंगचा वेग आणि परफॉर्मन्सची आकडेवारी जाहीर केलेली नाही.
9 – राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच भारताचे पहिले पदक पक्के; लव्हलिनाने थेट सेमीफायनलमध्ये दाखल
ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारतासाठी मोठी बातमी आली आहे. ऑलिम्पिक पदकविजेती महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहीनचे ७५ किलो वजनी गटात किमान कांस्यपदक पक्के झाले आहे. या गटात केवळ ५ महिला बॉक्सर असल्याने, रँकिंगनुसार लव्हलिनाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.
३१ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिचा सामना तुवालूच्या टाफाकीशी होईल. हा सामना जिंकल्यास तिचे रौप्य किंवा सुवर्णपदक पक्के होईल. भारताच्या १२५ खेळाडूंच्या पथकातील हे पहिलेच निश्चित झालेले पदक आहे.
10 – ‘जन नायकन’ची धडाकेबाज एन्ट्री; विजयच्या चाहत्यांचा जल्लोष!
तमिळ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा बहुप्रतीक्षित ‘जन नायकन’ चित्रपट अखेर २३ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सेन्सॉर प्रक्रियेतील अडथळ्यांनंतर झालेल्या या रिलीजमुळे तमिळनाडूत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
पहाटेपासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, ढोल-ताशे, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दणाणून गेले. विजय यांच्या भव्य कटआउट्सवर दुधाचा अभिषेकही करण्यात आला. पडद्यावर विजय यांची एन्ट्री होताच चाहत्यांनी जल्लोष केला.
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा विजय यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट मानला जात असल्याने ‘जन नायकन’ला राजकीय आणि वैयक्तिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिनेमात विजय, पूजा हेगडे, बॉबी देओल, ममीथा बायजू, प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत.





