IND vs AUS : संघ बदलला, कर्णधार बदलला, पण तरी संपेना साडेसाती! भारताने सलग १८व्यांदा केला ‘हा’ नकोसा विक्रम

IND vs AUS India Team loss 18th consecutive tosses : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने सलग 18 व्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यावेळी कर्णधार बदलले, संघात बदल झाले, तरीही नाणेफेकीच्या बाबतीत नशिबाने साथ दिली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये शुबमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करताना तिन्ही वेळा भारताने नाणेफेक हारली आहे.
मालिका आधीच गमावली, क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान
भारतीय क्रिकेट संघाला मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात 2 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. मालिका आधीच गमावलेल्या भारतीय संघापुढे आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल –
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे, तर नितीश रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रभाव पाडता आला नव्हता. नितीश रेड्डीला दुखापतही झाली आहे. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडचा विक्रमी धमाका! स्टीव्ह स्मिथला मागे टाकत रचला नवा इतिहास
दुसऱ्या सामन्यात विजयाची संधी हुकली
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 264 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली होती. मात्र, इतर फलंदाजांनी त्यांना पुरेशी साथ दिली नाही. गोलंदाजीमध्ये हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांनी खूप धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कोनोली यांच्या खेळीच्या जोरावर लक्ष्य गाठले. भारताला शेवटचे दोन गडी बाद करण्या अपयश आल्याने विजयाची संधी हुकली.
तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकानंतर 4 बाद 189 धावा केल्या आहेत. कूपर कॉनोली (3) आणि मॅट रेनशॉ (53) सध्या खेळत आहेत. भारताकडून सिराज, राणा, सुंदर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली आहे. अशा प्रकारे भारतीय संघ आता तिसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करून मालिकेतील सलग तिसऱ्या पराभवाला ब्रेक लावण्याच्या प्रयत्नात आहे.





