IND vs AUS : अखेरचा सामना रद्द; तरीही भारत विजयी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20I मालिकेतील वर्चस्व कायम

IND vs AUS India Wins T20 Series Australia 2-1 : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियातील टी-20 मालिका जिंकण्याची आपली परंपरा पुन्हा एकदा कायम राखली आहे. भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. ब्रिस्बेन येथील मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या हातून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी निसटली.
या विजयासह, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये सलग पाचवी टी-20 मालिका जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असतानाच पावसामुळे खेळ थांबला.
गिल-अभिषेकची तुफान फलंदाजी अन् सामना रद्द –
🚨 The 5th T20I has been called off due to rain.#TeamIndia win the series 2-1 🏆
Scorecard ▶️ https://t.co/V6p4wdCkz1#AUSvIND pic.twitter.com/g6dW5wz1Ci
— BCCI (@BCCI) November 8, 2025
शनिवारी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासूनच चौकार-षटकारांचा वर्षाव करत धमाकेदार सुरुवात केली. गिलने एकाच षटकात चार चौकार मारले. दुसरीकडे, अभिषेक शर्माला दोन वेळा जीवदान मिळाले आणि त्यानेही त्याचा फायदा घेत ताबडतोब फलंदाजी केली.
मात्र, टीम इंडियाने 50 धावांचा टप्पा पार करताच, खराब हवामान आणि वीज चमकू लागल्यामुळे खेळ थांबवावा लागला आणि सर्व खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 4.5 षटकांत बिनबाद 52 धावा अशी होती आणि एकही गडी बाद झाला नव्हता. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला आणि सुमारे सव्वा दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गिल 16 चेंडूंत 29 धावा आणि अभिषेक 13 चेंडूंत 23 धावा काढून नाबाद राहिले.
भारताने 2022 पासून एकही टी-20 मालिका गमावली नाही –
या विजयासह, टीम इंडियाने 2022 पासून एकही टी-20 मालिका न हरण्याचा आपला विक्रमही कायम राखला आहे. या कालावधीत भारतीय संघाने 9 द्विपक्षीय मालिका जिंकल्या, तर एक मालिका अनिर्णित राहिली. याव्यतिरिक्त, याच दरम्यान टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि आशिया कपचे विजेतेपद देखील पटकावले आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी हा विजय विशेष आहे, कारण टीम इंडिया मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर सलग दोन सामने जिंकून पुनरागमन केले आणि तोच शेवटचा निकाल ठरला. या दमदार विजयानंतर भारतीय संघ आता जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल.





