पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : शहरात तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका वाढला असून, शहरातील पाण्याची मागणी दहा ते बारा टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे महापालिकेकडून धरणातून घेतले जाणारे पाणीही जादा उचलले जात असून, हा आकडा दैनंदिन १६९० ते १७०० एमएलडी प्रतिदिनपर्यंत पोहोचला आहे.
अवघ्या महिन्यापूर्वीच महापालिकेने शहरातील पाणी नियोजन सुरळीत करतानाच, पाणी बचत करण्यात यश मिळविले होते. त्यामुळे महापालिकेचा पाणी वापर दैनंदिन १५६० एमएलडी प्रतिदिनपर्यंत खाली होता. मात्र, उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेचा पाणी वापर वाढला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतून जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असून, उन्हामुळेही पाणी वेगाने कमी होत असल्याचे चित्र असून, वेळीच नियोजन न झाल्यास मे महिन्यात पुणेकरांवर पाण्याचे गंभीर संकट उद्भवण्याची चिन्हे आहेत.
पाणी नियोजन कोलमडले
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आजअखेर १३.३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १५.७९ टक्के होता. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यातच यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असून, शहराचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यातच उन्हाचा चटका अधिक आहे.
परिणामी, नागरिकांची पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली असून, कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी होती. त्यामुळे तुलनेने पाण्याची मागणी कमी होती. मात्र, त्यानंतर गेल्या दहा ते १२ दिवसांत पाण्याची मागणी १०० एमएलडीने वाढली आहे.
बचतीवर उन्हाचा चटका भारी
धरणात यंदा कमी पाणी असल्याने पाटबंधारे विभागाने काही महिन्यांपूर्वीच पालिकेने दैनंदिन पाणी वापर कमी करावा, यासाठीची मागणी पाटबंधारे विभागाने होती. त्यानंतर पालिकेने प्रत्यक्षात नियोजन सुरू केले. त्यात गळती, तसेच काही भागांतील पाण्याचे नियोजन बदलण्यात आले.
त्यापूर्वी पालिकेचा दैनंदिन १७५० एमएलडीच्या आसपास होता. त्यानंतर पालिकेने बचत सुरू केल्याने हा पाणी वापर अनेकदा १५५० ते १५९० पर्यंत कमी करण्यात पालिकेस यश आले. मात्र, आता तो पुन्हा १७०० एमएलडी वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणी बचतीवर उन्हाचा चटका भारी पडला आहे.
गेल्या आठवड्यापासून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी दाबाने, तसेच कमी वेळाने पाणी येण्याच्या तक्रारी आहेत, तसेच उन्हाचा चटका वाढल्यानेही दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढते. त्यानुसार सर्व भागाला पुरेसे पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून पाणी उपसा काही प्रमाणात वाढला आहे. – नंदकिशोर जगताप (पाणीपुरवठा विभाग)