पुणे -पावसाळ्यात आंबील ओढ्याला येणारा पूर रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पेशवेकालीन तलाव तसेच त्याच्या दक्षिणेस असलेल्या पेशवे तलावातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन्ही तलावांची साठवण क्षमता सुमारे 1 कोटी 20 लाख लीटरने वाढली आहे. त्यात, प्राणी संग्रहालयातील तलावाची क्षमता 1 कोटी तर पेशवे तलावाची क्षमता 20 लाख लिटरने वाढली असल्याचे महापालिकेच्या मल:निसरण विभागकडून सांगण्यात आले.
या आहेत नवीन उपाययोजना
प्राणी संग्रहालय तलावात दोन नवीन सायफन तयार करण्यात आले.
तलावाच्या नाल्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
तलावात येणाऱ्या सांडपाण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्प
दोन्ही तलावातील गाळ काढला
तलावाच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षात शहराच्या दक्षिण भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्यानंतर आंबील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे. त्यामुळे, अनेक घरांमध्ये पाणी घुसून आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे, महापालिकेकडून आंबील ओढ्याला सिमाभिंत बांधण्यासह, अनेक ठिकाणी गाळ काढणे, नव्याने कल्वर्ट बांधणे, अशी कामे केली जात आहे. आंबील ओढ्यात येणारे पाणी हे या दोन तलावांमधून येते. त्यामुळे महापालिकेकडून या तलावांमधील गाळ काढण्यासह, इतरही उपाय योजना करण्यात येणार आहेत.