पवनानगर, (वार्ताहर) – सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीने तुंग किल्ल्यावर केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला किल्ल्यावर मशाल उत्सव व तुंगाई देवीचा जागरण गोंधळ करण्यात आला.
मशाल महोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. तसेच किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षांपासून किल्ल्यांवर संवर्धनाची कामे करण्यात आली असून त्या कामाचा लोकार्पण करण्यात आले. तुंग गावातील महादेव मंदिरापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
प्रतिष्ठानच्या वतीने किल्ल्यावर महाद्वारस सागवाणी दरवाजा बसवण्यात आला आहे. तसेच किल्ल्यांवर दिशादर्शक फलक, माहिती फलक, स्थळदर्शक फलक, विरळ स्मारक, कड्यावर पायरी मार्ग, ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहे. या वेळी तुंग प्रकल्प प्रमुख सचिन शेडगे यांनी तुंग दुर्ग संवर्धन प्रकल्प बद्दल माहिती दिली.
या वेळी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणातून दुर्ग सेवक तसेच अनेक राजघराण्यातील वंशज व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व तुंग गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. आभार बाळासाहेब जमदार यांनी मानले.