पळसदेव, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली असल्याने गावांगावांतून टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे. सध्या तालुक्यातील 21 गावांना दररोज 43 टँकरने 117 खेपा पाणी पुरविले जात आहे. तर आठ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
सध्या सोलापूरला उजनीचे पाणी पिण्यासाठी नदीतून सोडण्यात आल्याने, टंचाईची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय टँकर भरण्यासाठीच्या स्त्रोतांची पाणी पातळी घटली जाणार असून, पाण्याचे स्त्रोत मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास, तालुक्याच्या एका बाजूला निरा नदी, दुसर्या बाजूला भिमा नदी आहे. दोन्ही नद्यांमध्ये निरा डावा कालवा व खडकवासला कालवा आहे.
मात्र तालुक्यातील ठराविक पट्टा कायम अवर्षण प्रवण क्षेत्र राहिला आहे. या पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी असते. या भागातून गेलेल्या खडकवासला कालव्यामुळे येथे हरितक्रांती घडण्याची आशा होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये कालव्याचे बेभरवशी झालेले आवर्तन, या भागाला दुष्काळाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरले आहे.
सध्या या भागातील काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सन 2018मध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यात 62 टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने, टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जल जीवन मिशनतंर्गत कामे पुर्णत्वाच्या प्रतिक्षेत
इंदापूर तालुक्यात जल जीवन मिशन कार्यक्रमातंर्गत 117 ग्रामपंचायतींना पाणी पुरवठ्यासाठी नवीन योजना मंजूर झाल्या आहेत. यापैकी 19 गावांच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित गावांच्या पाणी योजनांचे काम अद्यापही सुरु आहे. जिल्हा परिषदेमार्फत या गावांच्या पाणी योजनांसाठी सुमारे 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 29 गावांतील पाणी योजनांसाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे एकूण 770 कोटी रुपयांच्या पाणी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे प्रयत्न आहेत; मात्र योजनांचे काम मार्गी लागण्याच्या प्रतिक्षेत अनेक ग्रामपंचायती आहेत.
उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी
उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी होत आहे. उजनी धरणामध्ये तालुक्यातील 28 गावे बुडीत तर 5 गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना उजनीच्या पाण्याचा हक्काचा व कायमचा स्त्रोत आहे. यंदा मात्र दुष्काळाची टंचाई तीव्र असल्याने धरणग्रस्तांचे हक्काचे पाणी दुरावले आहे.
यातच नदीतून पाणी सोडल्याने धरणाच्या पाण्याने तळ गाठ गाठला आहे. परिणामी गावागावांच्या पाणी पुरवठा योजनांची पाणी पातळी खालावली आहे. येत्या काही दिवसांत उजनीलगतच्या गावांतूनही टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.