“बिनकामाच्या भोंग्यांना मी काडीचीही किंमत देत नाही”; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे गैरहजर राहिले. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर आता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
प्रवाशांच्या सोयीचे ‘एकच सामायिक कार्ड’ म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणा दांपत्यावर निशाणा साधला. “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.
“हिंदुत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राममंदिर बांधण्याचा निर्णयदेखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही तर कोर्टाने दिला आहे. मंदिर बांधतानाही तुम्ही झोळ्या पसरल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?,” अशी विचारणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
“साधु संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. पण आमच्या घरात दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो साधु संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख, माँसाहेब असतानाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याखेत समजावून सांगितलं आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंना यावेळी अप्रत्यक्षपणे राणा दांपत्याला दिला. तसेच “लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. हल्ली सभेचं पेव आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.





