Eknath Shinde : एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यातच मोठा डाव टाकणार? बड्या नेत्याचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा
Eknath Shinde : यासाठी बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची चर्चा आहे. मतांची गोळाबेरीज मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून ही रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून 18 जून या दिवशी मतदान तर 22 जून या दिवशी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असून 2 जूनला अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 4 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बैठका आणि चर्चांचं सत्र रंगत असतानाच ठाणे विधान परिषद मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ‘धक्कातंत्रा’चा वापर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्या जागी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासाठी बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची चर्चा आहे. मतांची गोळाबेरीज मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून ही रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.
यापूर्वी रवींद्र फाटक यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही शिंदेंकडून अचानक राजकीय चाल खेळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांतील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील किमान 75 टक्के मतदारसंख्या अस्तित्वात असल्यास निवडणूक घेण्याची तरतूद आहे.
विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येतात. यावेळी सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छूकांकडून मोर्चेबांधणी केली जात असून, महायुतीत इच्छूक अनेक आणि संधी कोणाला द्यायची असा पेचप्रसंग उभा ठाकला आहे.
कोण आहेत क्षितीज ठाकूर?
क्षितीज ठाकूर पालघर-वसई परिसरातील प्रमुख युवा नेते असून बहुजन विकास आघाडी (बविआ) पक्षाशी संबंधित आहेत. बविआचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. वसई-विरार आणि पालघर परिसरातील स्थानिक राजकारणात ठाकूर कुटुंबाचा मोठा प्रभाव मानला जातो.
क्षितीज ठाकूर यांनी वसई विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विकासकामे आणि युवकांमध्ये मजबूत नेटवर्क यामुळे ते चर्चेत असतात. सध्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे.






