जगप्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या नावांची घोषणा केली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार प्राप्तकर्त्यांची निवड केली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला जातो आणि त्याचे महत्त्व काय याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात…
ज्ञानपीठ पुरस्कार काय आहे?
1944 साली स्थापन झालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार दुसऱ्यांदा संस्कृत भाषेसाठी आणि पाचव्यांदा उर्दू भाषेसाठी दिला जात आहे. 21 लाख रुपये, वाग्देवीची मूर्ती आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा 1965 मध्ये मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना ओडक्कुझल या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला होता.
ज्ञानपीठ पुरस्कार देण्यामागचा उद्देश काय?
2022 चा हा प्रतिष्ठित पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला. श्री साहू शांती प्रसाद जैन यांनी 1961 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली. भारतीय साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय लेखकांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी या पुरस्काराची स्थापना केली. 22 पैकी कोणत्याही भाषेत लिखाण करणाऱ्या देशाच्या कोणत्याही योग्य नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो.
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कशी निवड केली जाते ?
विविध भाषांमधील साहित्यिक, शिक्षक, समीक्षक, बुद्धिमान वाचक, विद्यापीठे, साहित्यिक आणि भाषिक संस्थांकडून ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नामांकनासाठी नावे पाठवली जातात. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संबंधित भाषा सल्लागार समितीकडून तपासणी केली जाते. त्यानंतर हा पुरस्कार कोणाला द्यायचा याची निवड केली जाते. पुरस्काराची रक्कम, प्रमाणपत्र आणि वाग्देवीची कांस्य मूर्ती देण्यात आली आहे. 1965 मध्ये 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. 2005 मध्ये ती वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर पुन्हा यात वाढ करण्यात आली.
उत्कृष्ट उर्दू कवी गुलजार
गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात आणि ते या काळातील उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात. याआधी त्यांना त्यांच्या कामासाठी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. गुलजार यांचे खरे नाव संपूर्ण ‘सिंग कालरा’ आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी अविभक्त भारतातील झेलम जिल्ह्यातील देना गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माखन सिंग होते. गुलजार यांना अभ्यासात फारसा रस नव्हता. विशेष म्हणजे, ते बारावीच्या परीक्षेतही नापास झाले होते. पण त्यांची साहित्याची आवड कायम होती.
तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य
रामभद्राचार्य हे रामानंद संप्रदायातील सध्याच्या चार जगद्गुरू रामानंदाचार्यांपैकी एक आहेत आणि त्यांना ही पदवी 1982 मध्ये मिळाली होती. 22 भाषांवर प्रभुत्व असलेल्या रामभद्राचार्य यांनी संस्कृत, हिंदी, अवधी आणि मैथिलीसह अनेक भारतीय भाषांमध्ये कलाकृती निर्माण केल्या आहेत. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. रामभद्राचार्यांचे नाव गिरधर मिश्रा होते.
दोन महिन्यांच्या वयात ‘ट्रॅकोमा’ नावाच्या संसर्गजन्य आजारामुळे त्यांची दृष्टी गेली आणि सुरुवातीच्या काळात आजोबांनी त्यांना घरी शिकवले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी संपूर्ण भगवद्गीता लक्षात ठेवली होती. चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.