नंदूरबार – भारतीय हवामान विभागाने 6, 7 आणि 8 मार्चरोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर नंदूरबार जिल्ह्यात होळीनिमित्त भरलेला बाजार उडून गेला आहे. यावेळी व्यापारी आणि ग्राहकांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
नंदूरबार हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी आठवडाभरापासून बाजार फुललेला असतो. होळी निमित्त होळीचा बाजार करण्यासाठी नवापूर, विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा गावात मोठी गर्दी झाली होती. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने होळी बाजार विस्कळीत झाला. व्यापारी, ग्राहकांची धावपळ झाली. साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना झाल्याने ग्राहक अर्धवट बाजार करून घरी निघून गेले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गव्हाचे हाताशी आलेले पीक आता निसर्ग हिरावणार असल्याचे चित्र आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कटकडाटासह पाऊस झाला आहे.