गराडे, (वार्ताहर) – हिवरे (ता. पुरंदर) येथील शेतकर्यांच्या थेट बांधावर जाऊन कृषी कन्यांनी शेतकर्यांची भेट घेऊन त्यांना शेती व विकास सेंद्रीय शेती तसेच मिश्र पीक पद्धतीचे होणारे फायदे व होणारे तोटे याबाबत माहिती दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी कन्या चेतना झगडे, कल्याणी शिंदे, जया शिंपले, ऋतुजा वनवे, शिवानी ठोंबरे, नेहा शितोळे, कोमल पाटील, अमृता साठे, वैष्णवी साठे, दर्शना सूर्यवंशी, अल्पना सिंग, सपना जहांगीर, अश्विनी वरे, दिव्या पवार यांनी कृषी जागृती व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम निमित्त अभ्यास दौरा केला होता.
या दौर्यात शेतकर्यांना विविध गोष्टींची माहिती दिली. यात पीक संरक्षण व नियंत्रण माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, खताचा वापर यासंदर्भात माहिती दिली. यावेळी गावच्या सरपंच भारती गायकवाड, उपसरपंच रामदास कुदळे, ग्रामसेविका माधवी हरपळे, सदस्य सागर कुदळे, बन्याबाप्पू चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर, केंद्र समन्वयक डॉ. विजय तरडे, केंद्रप्रमुख डॉ. बनसोड आणि कार्यक्रम अधिकारी इंजि. एम. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.