अभिवादन :
पुरुषांप्रमाणे स्त्रीसुद्धा कर्तृत्ववान आहे, तिला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, तिचा उद्धार झाला पाहिजे. या हेतूने प्रेरित होत समाजकंटकांची व धर्ममार्तंडांची पर्वा न बाळगता आपल्या पतीच्या कार्याबरोबर उभी राहून स्त्री जन्माची गुलामीच्या जोखडातून मुक्ती करून अबलाची सबला करणाऱ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले यांची आज जयंती होय.
भारतात स्वातंत्र्याच्या संग्रामाबरोबर समाजसुधारणेची चळवळ मोठ्या जोमाने उभी राहत होती. भारतात विविध जाती धर्मात अनेक चाली, रिती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा होत्या. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व, अस्पृश्यता निवारणाबरोबर स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ उभी राहत होती. यात जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोलाचे आहे. पारतंत्र्य काळाच्या आधीपासून सामाजिक विषमता ही जात, धर्म, व लिंग या तीन गोष्टींवर आधारित होती. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीयांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे अधिकार नव्हते, धार्मिक बंधनाखाली स्त्रीवर अनेक बंधने लादली गेली होती. बालविवाह, सतीप्रथा, हुंडाप्रथा, विधवेचे केशवपन अशा चालीरितींनी लाखो स्त्रीयांचे आयुष्यच करपून गेले होते. शारीरिक व मानसिक गुलामी पिढ्यान्पिढ्या लादली गेली होती. या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्रियांच्या उद्धारासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी सारे आयुष्य खर्ची घातले.
सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंचा जोतिरावांशी 1840 साली विवाह झाला. लहानपणापासूनच त्या धीट होत्या. जोतिरावांना पुस्तके वाचण्यात गोडी होती याचे त्यांना कुतूहल वाटे. एक दिवस सावित्रीबाईंच्या हाती पुस्तक पाहून जोतिराव यांना मार्ग सापडला. त्यांची मावस बहीण सगुणाबाईंना व सावित्रीबाई यांना शिक्षणाबद्दल विचारताच त्यांनीही शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आणि सुरू झाला दोघींच्या शिक्षणाचा श्रीगणेशा. निसर्गातील वस्तू, शेतातील मशागती विषयक माहिती आणि लिखाण, वाचन तसेच इतिहासाचे कथा वाचन असे एकेक आकार घेत शिक्षण सुरू झाले. शिक्षण आकार घेत असताना जोतिराव यांच्या विनंतीस मान देऊन मिसेस मिचेल बाईंनी सावित्रीबाई व सगुणाबाईंची लेखी व तोंडी परीक्षा घेतली. या दोघींची हुशारी पाहून 1845-46 या वर्षात अध्ययन व अध्यापन असलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश दिला. पुढे दोन वर्षांचा कोर्स पूर्ण होऊन भारतातल्या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका कार्यसिद्धीसाठी सिद्ध झाल्या. पुढे अहमदनगरला सरस्वतीबाई गोवंडे यांच्याबरोबर अभ्यास केला तसेच जोतिरावांचे मित्र केशव भवाळकर यांनीही त्यांना अध्यापनाचे धडे दिले. सावित्रीबाईंवर इतिहास, भूगोल, गणित, ज्योतिष, खगोलशास्र, शब्दशास्र, म्हणी, संत वचने यांचा पगडा होता हे त्यांच्या चरित्रातून दिसते.
शिकलेली सावित्रीबाई समाजातील दुर्गुणांना गाडून ज्ञानाचे महत्त्व सांगणारी ज्ञानज्योती झाली. शिक्षण कार्य आरंभ झाले. जोतिरावांनी शाळेचा प्रस्ताव मांडला आणि सहकाऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांनी आपल्या राहत्या वाड्यातील खोली शाळेसाठी दिली. शिवाय दरमहा पाच रुपये देण्याचे ठरले तर मित्र म्हणून गोवंडे यांनी दरमहा दोन रुपये कबूल केले. जोतिरावांना विश्वास होता की माता साक्षर असेल तर महापुरुष जन्माला येईल, म्हणून स्त्री शिक्षणाला अग्रक्रम दिला. प्रथम 1847 मध्ये मागास वस्तीत शाळा काढून दिली परंतु पुढे ती शाळा बंद पडली. फुले हे अस्पृश्यांना तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करत असतानाच अमेरिकेतील मुलींना मिळणाऱ्या शिक्षणाची पद्धत सांगत तर सावित्रीबाई व सगुणाबाई पुण्यातील पेठांत फिरून मुलींना शिक्षणासाठी आवाहन करत. यावेळी त्यांना समाजाकडून अवहेलना सुरू झाली. अखेर 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. शाळेच्या हजेरी पटावर पहिल्या दिवशी 6 मुलींची नावे आली. भारतातल्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई जोतिराव फुले रुजू झाल्या. 1848 ते 1852 या चार वर्षांच्या काळात पुणे व ग्रामीण भागात 18 शाळा सुरू केल्या.
स्त्री शिक्षणाचा पाया उभा करताना कर्मठपणाचा सामना करावा लागला. त्यांचे कार्य देशभर गाजू लागले. अनेक शाळांची मागणी व वर्गणीही जमा होऊ लागली. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाबरोबर स्त्रीविषयक अनेक कार्य केले. प्रौढांसाठी शिक्षणाचे वर्ग सुरू केले तसेच शिक्षणाच्या जागृतीसाठी लोकनाट्य व लोकगीतांची रचना केली. सावित्रीबाईंनी शिक्षण पद्धतीमध्ये एकाच परिसरातील शिक्षक व मुले असल्यास मुलांचे मानसशास्र समजणे सोपे जाते हा विषय जोपासला. मातेचा आहार, विहार, विचार चांगला वाढला तर पुढील पिढीला संस्कारमय करणे सोपे जाईल म्हणून गर्भवती महिलांची योग्य जोपासना झाली पाहिजे यासाठी त्यांनी कार्य केले.
राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नातून 1829 साली लॉर्ड बेंटिंगने सतीबंदी कायदा लागू केला; पण त्यानंतर होणाऱ्या विधवा स्रियांना मात्र मरणयातना भोगाव्या लागत होत्या. या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विधवेने ब्रह्मचर्य पाळणे, दुसरा विवाह न करणे, केशवपन करणे, सामाजात न वावरणे, चांगले कपडे परिधान न करणे अशा अनेक गोष्टींची विधवांना बंधने घालणाऱ्या प्रथा होत्या. विधवेच्या हातून अनिष्ट घडले तर समाज मान्यता नव्हती म्हणून यावर उपाय म्हणून 1853 साली फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. यात विधवांचे बाळंतपण केले जात. या अनाथाश्रमात मुलांची काळजी सावित्रीबाई घेत. विधवा विकासासाठी पुणे शहरात भिंतीवर पत्रके चिकटवली जाऊ लागली. पुढे फुले यांनी काशीबाई या विधवेचे मूल दत्तक घेतले. केशवपन बंद करण्यासाठी जोतिरावांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणला.
बालविवाह बंदीसाठी प्रयत्न केले. 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला आणि 1860मध्ये या दाम्पत्याने सत्यशोधक पद्धतीने एका जोडप्याचा विवाह लावला. 1876 सालच्या दुष्काळात माणसांची अवस्था मरणासन्न झाली होती. त्यांनी स्वतः व दानशूर व्यक्तींना आवाहन करून मोठे मदत कार्य केले. पुन्हा असाच दुसरा दुष्काळ 1896 साली पडला. यातही त्या कुठे कमी पडल्या नाहीत. 1896 साल संपत नाही तोच पुण्यात 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातले. सावित्रीबाईंनी पुण्याजवळील ससाणे यांच्या माळावर एक दवाखाना सुरू केला व रोग्यांना मोठा आधार देऊ लागल्या. परंतु दुर्दैवाने त्यांनासुद्धा प्लेग जडला.1890 साली जोतिरावांचे निधन व आयुष्यभर जिवाभावाची साथ देणारी सगुणाबाईही सोडून गेल्या. परंतु त्यांच्यापश्चात त्यांनी सर्व कार्य नेटाने सांभाळत असताना साथीने 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु एका युगस्त्रीने समाजाला दिलेली शिक्षणाची ज्ञानज्योत निरंतर तेवत राहिली.
– विठ्ठल वळसे पाटील