इंदापूर – इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. 20) दुपारी बाराच्या आधीच पार पडला. गावपातळीवरील ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने अनेक दिग्गजांना गोरगरीब जनतेने आसमान दाखवत सत्तेवरील सारीपाट निश्चित केला आहे. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसने 15 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला असल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले, तर भाजपने 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण झाले आहे, असे पत्राने कळवले आहे.
भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे या दोन्हीही पक्षप्रमुखांच्या गावांचे ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून, यामध्ये राष्ट्रवादीचा निसटता पराभव सराटी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेला दिसतो. इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सराटीवर सत्ता आली आहे.
बेलवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे तालुका अध्यक्ष शरद जामदार यांचा वरचष्मा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी लाखेवाडी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीमध्ये भाजपला रामराम करत प्रवेश केला होता. श्रीमंत ढोले यांचे खुद्द लाखेवाडीत त्यांच्या पत्नी चित्रलेखा ढोले या सरपंचपदी घवघवीत मताने विजय ठरल्या.
लाखेवाडीचे ज्येष्ठ नेते आणि नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव नाईक तसेच भाजपचे युवा नेते विष्णू जाधव यांनी नव्या कार्यकर्त्यांची मोट एकत्र करत, राष्ट्रवादीला टक्कर दिली आहे, त्यामुळे आगामी काळात भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लाखेवाडी गावला झुकते माप देतील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
भाजपचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय –
“तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक भाजपचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विजय झाला आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेला हा विजय सर्वसामान्यांचा विजय आहे. सर्वाधिक 19 सरपंच हे भाजपचे आले आहेत”
– राजवर्धन पाटील, भाजप युवा मोर्चा कोअर कमिटी प्रमुख, इंदापूर