शर्मिला जगताप
आपल्या बरोबरीने पत्नी व्यवसाय करू लागली आणि तिची सरशी असली की पुरुषी अभिमान कसा फुंफटत जागा होतो, त्याचे उत्कृष्ट चित्रण हृषिकेश मुखर्जींनी अभिमान या चित्रपटातून सत्तर-ऐंशीच्या दशकात केले आहे. स्त्रियांनी काही व्यवसाय करायला लागणे ही आपल्या जीवनातली हरघडी दिसणारी जवळची परिस्थिती. त्यामुळे काम करणाऱ्या स्त्रिया आणि सुजाण रसिक यांना हा हिंसाचार आक्रस्ताळेपणा नसलेला सौम्य चित्रपट रूचून जाईल.
असं म्हणतात की, लोकप्रिय पार्श्वगायक किशोर आणि त्यांची पहिली पत्नी रुमा यांच्यातल्या वेबनावातून या चित्रपटाची गोष्ट निघाली. यासाठी नावे देखील सुबिर (पॉप सिंगर) आणि उमा (शास्त्रोक्त गायिका) अशी घेतली आहेत. अमिताभ-जया यांच्या विवाहानंतरचं हे पहिलेच चित्र. त्यातून त्या दोघांचा व्यवसाय एक त्यामुळे या चित्राला एक वेगळी रंगत आली आहे.
एखाद्या नटाला असावी तशी सुबीर अस्थिर जीवनामुळे, प्रसिद्धीच्या झगमगटाला कंटाळून एकटे आयुष्य जगत असतो. सुबीर मावशीच्या गावी जातो, तिथं उमाचं गाणं त्याला भान विसरायला लावतं. मग झट मंगनी पट ब्याह! खरा बदसूर ती दोघं एकत्र गायला लागतात तेव्हा उमटतो. उमा अधिक लोकप्रिय होत राहते.
मत्सराने, खोट्या अभिमानाने घेरलेला सुबीर गायचं बंद करतो. पूर्वायुष्यातल्या मैत्रिणीशी त्याचे संबंध वाढत जातात. उमा माहेरी निघून येते. तिचं मूल जन्मतःच दगावतं. तरी हा तिला भेटत नाही की दोन ओळीचं पत्र लिहीत नाही. सुबीरचं गाणं आधीच बंद झालेलं, उमाचा तर आवाजच हरपतो. अखेर मावशीच्या कानउघाडणीने सुबिर तिला परत आणतो, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही परत येत नाही.
अखेर एका संगीतोत्सवात सारा अभिमान सोडून सुबीर पुन्हा गायला उभा राहतो नि इतक्या दिवसांत उरी दडपून ठेवलेले सारे अपमान शल्य रड्याच्या रूपानं बरसतात. उमा पुन्हा गाऊ लागते. गोष्ट अगदी छोटी पण आजच्या काळातही जशीच्या तशी लागू होते.
महिलांच्या प्रगतीमुळे इतर पुरुषांचं सोडाच, स्वतःच्या पतीला तरी अभिमान वाटतो का, हा आज नवरात्रोत्सवानिमित्त प्रश्न विचारावासा वाटतो. महिला अनेक क्षेत्रात प्रगती करीत असताना पती, कौटुंबिक ताणतणाव मात्र अजूनही तिच्या आयुष्यात जसाचा तसा आहे. पत्नीचा “अभिमान’ वाटावा, असा दिवस कधी येईल?