पुणे/येरवडा – विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक 1 येथील शिवकैलास स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमी परिसरात रात्रीच्यावेळी दारूच्या पार्ट्या होत आहेत. रात्रीच्या अंधारात तळीराम तर्र होऊन मोठमोठ्याने ओरडत असतात.
महापालिकेने तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.
महापलिकेने या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी दिव्यांची व्यवस्था केली होती; परंतु हे तळीराम दिवे फोडत असून वीज पुरवठा खंडित करण्याकरिता वायरही तोडत आहेत.
येथे सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविलेले आहेत. मात्र, रात्रीच्यावेळी अंधार असल्याने सीसीटीव्हीचा फारसा उपयोग होत नाही.
स्मशानभूमीवरील पत्रेही खराब झाले आहेत. स्मशानभूमी परीसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी तसेच पोलिसांनीही या ठिकाणी गस्त करावी, अशी मागणी होत आहे. स्मशानभूमीकडे जाण्याऱ्या रस्त्यावर कमान बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अर्धवट आहे, याच ठिकाणी लोखंडी प्रवेशद्वार केल्यास तळीरामांकडून होणारा त्रास कमी होईल. स्मशानभूमीकडे जणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे प्रवेशद्वारावरच पाणी साचले आहे. नगरसेवक तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यात लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे. यात प्रवेशद्वार
तसेच आतील दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन आहे. स्मशानभूमीच्या आसपास कचरा करणाऱ्यांना 5000 हजारांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे.
– एश्वर्या जाधव, नगरसेविका, प्रभाग क्रमांक-1