पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदन दास देवी यांचे आज बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या सकाळी 11 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
मदन दास देवी यांचा जीवनप्रवास –
मदनदासजी यांचं मुळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील BMCC कॉलेज येथे 1959 ला प्रवेश,M.Com नंतर ILS Law कॉलेज मध्ये गोल्ड मेडल पदकासह LLB केले आहे. राष्ट्रीय स्तरावर रँक मध्ये CA शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना वरिष्ठ बंधू श्री खुशालदास देवी यांच्या प्रेरणेनी संघात दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, तत्कालीन संघाचे पदाधिकारी प्रल्हादजी अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्याशी वैचारिक चर्चा, संघ परिवारातील विविध आयामा विषयी विस्तारीत सल्ला मसलत, अनेक पैलूंवर विचारधारेची स्पष्टता घेत राष्ट्रीय पुन्रनिर्माणच्या व्यापक संदर्भात संघ कार्यास समर्पित जीवनास सुरुवात केली होती. 1969 पासून ते संघ प्रचारक आहे. विविध उत्तरदायित्वा- नंतर योजनेतून साधारणतः 1975 पासून अभाविप आयामात जबाबदारी त्यांच्याकडे होती.
अभाविपत विभाग, प्रदेश, क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ.भा. संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत नींव के पत्थर प्रमाणे कार्य करीत अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेले. पायाला भिंगरी लावल्यासारख सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली. थोडक्यात अनेक पिढ्या घडविलेले मदनदासजी यांचे आज बेंगळुरू येथे दुःखद निधन झाल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.