संपूर्ण देश आजचा स्वातंत्र्य दिन नेहमीच्या उत्साहाने साजरा करण्यास सज्ज झाला आहे. आपल्या व्यक्तिगत अडीअडचणी आणि समस्यांकडे एक दिवस कानाडोळा करून सामान्य माणूसही या स्वातंत्र्य सोहळ्यात उत्साहाने सहभागी होत असतो. आजच्या कथित नवीन भारतात बरेच काही उत्तुंग स्वरूपात सुरू आहे असे सामान्यांना सांगितले गेले आहे, त्याचे राजकीय विश्लेषण करण्याचा हा दिवस नाही, पण जो काही नवीन भारत सांगितला जात आहे, त्यातले थोडेफार तरी आपल्यापर्यंत पोहचले पाहिजे अशी अपेक्षा जर सामान्य माणूस व्यक्त करीत असेल तर त्यात काही वावगे आहे, असे म्हणता येणार नाही. या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज इस्रोकडून सर्वसामान्यांना अभिमान वाटावा अशी बातमी आली आहे. चंद्राच्या दिशेने झेपावणारे चांद्रयान 3 चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेत पोहचले आहे आणि प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभूमीवर ते 23 ऑगस्टच्या सुमाराला उतरेल अशी अपेक्षा आहे.
स्वातंत्र्य सोहळा सादर करत असताना यासारखी दुसरी चांगली बातमी नाही. अर्थात, आपण या आधीच दोन चांद्र मोहिमा पार पाडल्या असून मंगळाच्या दिशेनेही आपण कुच केली आहे. या नवीन मोहिमेविषयी उत्सुकता इतकीच आहे की, मागच्यावेळी प्रत्यक्ष चंद्रावर यान उतरवण्याचा आपला प्रयत्न तितका यशस्वी झाला नव्हता, यावेळी तो यशस्वी होणार की नाही याचे मोठे कुतूहल आहे. मागच्या अनुभवावरून यावेळी कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली असल्याचे आश्वासन इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांत यश लाभो आणि देशाच्या प्रतिष्ठेला चार चांद लागोत अशीच सर्वांची अपेक्षा असणार. देशात आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगानेही काही नव्या प्रकल्पांच्या पायाभरणीची सुरुवात होत आहे आणि काही प्रकल्पांचे प्रत्यक्ष उद्घाटन सोहळेही आपल्याला पहायला मिळणार आहेत. देशाच्या वैभवात भर घालणारे काही नवीन काम होत असेल तर त्याचाही आनंद वाटल्याशिवाय राहात नाही.
पंतप्रधानांच्या लालकिल्ल्यावरील ध्वजारोहणानंतर होणाऱ्या भाषणातून या साऱ्यांचा रितसर आढावा सादर होईलच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे शेवटचे ध्वजारोहण असणार आहे. शेवटचे या अर्थाने की त्यांची दुसरी टर्म संपत असल्याने त्या टर्ममधील हे शेवटचे भाषण असेल. कारण पुढच्या स्वातंत्र्यदिनी देशात मोदींची तिसरी टर्म सुरू झालेली असेल किंवा दुसराच कोणी तरी पंतप्रधानपदी विराजमान झालेला असेल. यातले नेमके काय होणार याचीही उत्सुकता आतापासूनच लोकांना लागून राहिली आहे. पंतप्रधानांच्या लालकिल्ल्यावरील भाषणात काय नवीन मुद्दे असणार याचेही कुतूहल आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे शेवटचे भाषण असल्याने तेही या संधीचे औचित्य साधतील आणि आणखी काही नवीन कार्यक्रम देशापुढे ठेवतील अशीही अपेक्षा आहे. पण पंतप्रधानांना यावेळी जरा जपूनच भाषण करावे लागेल, कारण त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचे अचूक विश्लेषण करून त्याविषयी बरेवाईट टिप्पणी करणारे विश्लेषक दबा धरूनच बसलेले असणार. मागील काही भाषणांमध्ये त्यांनी त्याच त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती केली होती व प्रत्येक वेळी आपण हे नव्याने जाहीर करीत आहोत असे त्यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत भासवले होते. यातील ठळक बाब म्हणजे प्रधानमंत्री गती शक्ती योजना.
या योजनेद्वारे देशात शंभर लाख कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांची सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी लालकिल्ल्यावरील सलग तीन भाषणांमध्ये केली होती. आता मात्र त्यांना उद्याच्या भाषणात या योजनेत प्रत्यक्ष प्रगती किती झाली, त्यातल्या किती लाख कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात सुरू झाली याचा तपशील द्यावा लागणार आहे. अन्यथा त्यावरूनही देशात मोठीच राजकीय संदोपसुंदी सुरू होऊ शकते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला काही राज्यांमध्ये सुरू झालेल्या जातीय व धार्मिक हिंसाचाराचीही काळी किनार आहे. धुमसते मणिपूर अजूनही शांत झालेले नसतानाच हरियाणात नव्याने धार्मिक हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. भारत ही शांतता, प्रेम आणि सद्भावनेचे वातावरण जपणारी भूमी आहे. येथे प्रत्येक महात्म्याने, साधुसंतांनी आणि वेळोवेळी उभ्या राहिलेल्या जननायकांनी देशातील सद्भावना, सलोखा आणि शांतताच जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशात नव्याने पेटलेल्या हिंसाचाराची स्थिती ठीक करण्यासाठी देशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधानांनाच जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने ते काय भूमिका उद्या मांडणार हेही पहावे लागेल.
स्वातंत्र्य दिन सोहळा हा देशाच्या एकूणच प्रगतीच्या सिंहावलोकनाचा दिवस असतो. देशातील नागरिकांच्या सुख समृद्धीच्या दृष्टीने सद्यस्थितीचा आढावाही घेण्याचा दिवस असतो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर लोक महागाई, बेरोजगारी आणि देशाची एकूणच आर्थिक स्थिती या अनुषंगानेही अवलोकन करीत असतात, किंबहुना तसे अवलोकन केले जाणे अपेक्षित आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार केला तर स्थिती फारशी बरी नाही हेही प्रकर्षाने नमूद करावे लागेल. हे मुद्दाम नमूद करण्याचे कारण असे की सरकारला समस्यांचे नेमकेपणाने आकलन झाले तरच त्यांना त्यावर उपाययोजना करणेही सोपे होते, पण गेल्या काही काळाचा विचार केला तर विद्यमान सरकार समस्यांच्या बाबतीत कायमच डिनायल मोड मध्ये दिसून आले आहे. सध्याच्या सरकारला आता ही भूमिका बदलावी लागेल. समस्या मान्य करून त्यावरील रोडमॅप नेमकेपणाने लोकांपुढे, ठेवावा लागेल.
स्वातंत्र्य दिनाचा विषय हा या लोकशाही देशात लोकांच्या विविध स्वरूपाच्या स्वांतत्र्याशीही निगडीत आहे. यात सरकारच्या कार्याचे मुक्तपणाने विश्लेषण करण्याचे स्वातंत्र्य, सरकारच्या गैर वाटणाऱ्या धोरणांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य, लोकप्रतिनिधींना संसद आणि विधिमंडळात मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आणि सरतेशेवटी घटनेने मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे स्वातंत्र्य याचाही यात अंतर्भाव असतो. सध्याच्या राजवटीत या स्वातंत्र्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे आक्षेप आहेत. स्वातंत्र्याचा होत असलेला संकोचही अनेक ठिकाणी दिसून येत आहे. याबाबतीतही सरकारने लोकांच्या या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्याची जपणूक होईल अशी नि:संदिग्ध ग्वाही देणेही अपेक्षित आहे. त्यासाठीची आपली वचनबद्धता सरकार प्रामाणिकपणे व्यक्त करेल अशी अपेक्षा बाळगू या. असे झाले तरच आपले प्रजासत्ताक अधिक तेजाने उजळून जाणार आहे.