आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वात यंदा बदल केला गेला. भविष्याचा विचार करून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आणि तिथेच मिठाचा खडा पडला. मुंबईचे चाहते इतके संतापले की पंड्याबद्दल अपशब्दही वापरायला त्यांनी कमी केले नाही. इतका टोकाचा राग कशासाठी, असा प्रश्न पडतो. तेदेखील एका सर्वसामान्य क्रिकेट स्पर्धेतील एका संघाने केलेल्या बदलावरून हा शिमगा सुरू आहे. वास्तविक आयपीएल स्पर्धा एक व्यावसायिक स्पर्धा असून तेथे केवळ नफा हे एकच तत्त्व मानले जाते. मग अशा वेळी पुढील काही वर्षांचा विचार करत संघाच्या हितासाठी काही निर्णय घेतले गेले तर बिघडले कुठे? परंतु आपल्या देशात व्यक्तिपूजा इतकी महत्त्वाची मानली जाते की आपल्या आवडत्या व्यक्तीने काहीही केले किंवा त्याच्याबाबत काहीही घडले तरी तो आपल्या घरातील प्रश्न असल्यासारखे आपण वागतो. मुळात या बदलाबाबत रोहितने एकही शब्द तोंडातून काढलेला नाही. मात्र, त्याचे चाहते पंड्याला ‘छपरी’ म्हणण्यापर्यंत वाहवत गेले ही शोकांतिका आहे.
वास्तविक पंड्या एक अष्टपैलू क्रिकेटपटू तर आहेच परंतु एक जिद्दी खेळाडू देखील आहे. कधीही हार न मानणारा खरा लढवय्या आहे. तरीही तो आपल्या संघाचा कर्णधार का केला गेला व त्यासाठी तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवून देणार्या रोहितचा बळी का घेतला, हा प्रश्न चाहते सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठावरून विचारत आहेत. गुजरात टायटन्स संघ दोन वर्षांपूर्वी जेव्हा आयपीएलमध्ये दाखल झाला तेव्हा पंड्याच्याच नेतृत्वाखाली संघाने पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यानंतर गेल्या वर्षी गुजरात संघाने अंतिम फेरीतही स्थान मिळवले. अर्थात, त्यावेळी विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली असली तरीही मातब्बर संघांना मागे टाकत अंतिम फेरी गाठणे ही काही कमी मोलाची कामगिरी निश्चितच नाही. पंड्याचे हेच कर्तृत्व मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाच्या ध्यानात आले व त्यांनी त्याला ट्रेड केले.
त्याची जितकी किंमत गुजरातने मोजली होती ती त्यांना परत देण्यात आली व एका साध्या सरळ व्यवहारातून पंड्या मुंबईच्या संघात डेरेदाखल झाला. हा सगळा व्यवहार एका संघमालकाने दुसर्या संघमालकाशी केला त्यात सर्वसामान्य चाहत्यांना आरडाओरडा करण्याचे काहीच कारण नाही. यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई संघाने तीन सामने खेळले व त्या सर्व सामन्यांत पराभव झाला. तो केवळ एकट्या पंड्यामुळेच झाला का. माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबई संघाने पराभव पाहिलेलाच नव्हता का, असे नाही; परंतु चाहते इतका जर विचार करायला लागले तर आपल्यालाच आश्चर्य वाटेल अशी स्थिती आहे. क्रिकेट व क्रिकेटपटू यांना देवत्व बहाल करणारे आपण आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहोत का? या स्पर्धेच्या इतिहासात मुंबईचे नेतृत्व अनेक जणांनी केले आहे. मग तो सचिन तेंडुलकर असो, हरभजनसिंग असो या प्रत्येक खेळाडूवर नितांत प्रेम करणारे चाहते पंड्याबाबतच इतके आक्रमक का झाले याचाही विचार करणे शक्य होत नाही. बरे तो काही परदेशी खेळाडू नाही की त्याचा हेवा करावा.
तो आपलाच आहे. त्याने आपल्या कामगिरीने अनेकदा भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. प्रत्यक्ष ज्याला क्रिकेटचा देव मानले जाते त्याच्या नेतृत्वात तरी भारतीय संघाने फार काही चमकदार कामगिरी केली नव्हती. म्हणजे प्रत्येक महान क्रिकेटपटू महान कर्णधार होतोच असे नाही. हेदेखील आपल्या चाहत्यांनी मान्य केले पाहिजे. कपिल देवपासून आताच्या रोहित शर्मापर्यंत प्रत्येकाने भारतीय संघाचे सुकाणू आपल्या हाती घेतले व ज्याच्या त्याच्या नशिबाने व सहकारी खेळाडूंच्या साथीने आपली कामगिरी संमिश्र झाली. तसेच मुंबई इंडियन्सचे आहे. त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये सचिनसह कॅरन पोलार्डसारखे अव्वल खेळाडू संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. पण अनेकवेळा तुमची कामगिरी अपेक्षेनुसार होत नाही. त्यासाठीच कर्णधारपदाला काटेरी मुकुट म्हटले जाते.
संघ जिंकला तर तो कोणा एका खेळाडूच्या जीवावर परंतु हरला तर कर्णधारामुळेच हे मानण्याची आपली खूप जुनी परंपरा आहे. आयपीएल स्पर्धेतील आणखी एक संघ चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व इतकी वर्षे महेंद्रसिंह धोनी करत होता. त्यानेही संघाला पाचवेळा विजेतेपद पटकावून दिले आहे; परंतु यंदा त्याने नेतृत्व सोडले व महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे ही जबाबदारी दिली. त्यावेळी हा निर्णय धोनीच्या तसेच चेन्नईच्या चाहत्यांनी स्वीकारलाच ना, मग मुंबईचे चाहते हा निर्णय का स्वीकारत नाहीत हेदेखील एक कोडेच आहे. तसे पाहायला गेले तर ऋतुराज एकदमच नवखा आहे तरीही धोनी त्याचे आदेश शिरसावंद्य मानतो. मुंबईच्या नव्या कर्णधार पंड्याने रोहितला एकदा काय सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करायला पाठवले तर इतका आकांडतांडव केला गेला की विचारू नका.
अरे हे सगळे आपलेच खेळाडू आहेत. ते आज वेगवेगळ्या संघातून खेळत असले तरीही येत्या काळात आयपीएल स्पर्धा संपल्यावर ते देशाकडून एकाच संघात खेळणार आहेत. त्यांच्याबाबतचा बेबनाव प्रत्यक्षात उतरला तर भारतीय संघाची काय स्थिती होईल याची थोडीतरी शंका येते का, असा प्रश्न आता चाहत्यांना विचारावसा वाटतो. खूप वर्षांपूर्वी युवराज सिंग पंजाबकडून खेळत असताना मुंबईच्या प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यावेळी बक्षीस समारंभाच्या वेळी त्याने मुंबईच्या चाहत्यांना विचारले होते की, आम्ही तुमचे नाही का? केवळ एका स्पर्धेत अन्य संघाकडून खेळत असल्यामुळे आम्ही अपराधी ठरत नाही, आम्हीही तुमचेच आहोत. त्यावेळी वानखेडेवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने उभे राहून युवराजला मानवंदना दिली होती व आपलेपणा दाखवत माफीही मागितली होती. मग पंड्याच्याच बाबतीत हे चित्र कशासाठी? नुकतीच होळीपौर्णिमा संपली. मात्र, आयपीएलच्या मातीत पेटलेल्या या होळीचा शिमगा आणखी किती दिवस जळत राहणार आहे.