बांगलादेश या शेजारी देशात रविवारी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. खालीद झिया यांच्या बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीने या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या निवडणुका हंगामी सरकारच्या देखरेखीखाली व्हाव्यात अशी या पक्षाची मागणी आहे. मात्र पंतप्रधान आणि आवामी लीग पक्षाच्या अध्यक्षा शेख हसिना यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. बांगलादेशात लोकशाहीच आहे. ती अबाधित राहावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्याकरता निवडणुका व्हाव्यात आणि त्या पारदर्शीपणे व्हाव्यात अशी अमेरिकेची इच्छा आहे. चीनच्या संदर्भात व्यूहात्मक दृष्ट्या अमेरिकेसाठी बांगलादेश महत्वाचा असल्याने त्यांना या देशात स्वारस्य आहे. तसेच स्वारस्य भारत आणि चीनलाही आहे. प्रत्येकाची भूराजकीय गणिते आहेत. त्यामुळे बांगलादेशातील निवडणुका महत्वाच्या आहेत. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर भारताला त्या देशातील विद्यमान राजवटच अधिक फायद्याची किंवा कमी जाचाची ठरणार आहे.
प्रमुख विरोधी पक्षानेच निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने हसिना यांना सलग चौथ्यांदा विजय मिळणार हे जवळपास निश्चित आहे. 2014 पासून त्या सत्तेत आहेत आणि त्यांना आणखी पाच वर्षे मिळतील. त्यांनी एरव्ही सलग चौथ्यांदा सत्ताप्राप्तीचा करिश्मा साध्य करून दाखवला असता तर त्याची मुक्तकंठाने प्रशंसा झाली असती. त्यांच्या कारकीर्दीची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली असती. तथापि, तसे होताना दिसत नाहीये. त्याचे कारण देशात सातत्याने हिंसक आंदोलने सुरू आहेत. त्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीच्या हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आतातर काळजीवाहू सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या पक्षाने निवडणुकीच्या अदल्या दिवशी म्हणजे 6 जानेवारीला सकाळी सहा वाजल्यापासून बंद पुकारला आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी बंद समाप्त होणार आहे. एकप्रकारे पुन्हा निवडून येण्यात हसिना यांच्या आवामी लीगला कोणताही अडथळा नाही.
मात्र या निवडीला तेवढी प्रतिष्ठा असेल का हा प्रश्न असतो. सलग एका पक्षाची प्रदीर्घ राजवट असल्यावर जनतेत नाराजी असते. तद्वतच कोणाकडून आव्हानच नसल्यामुळे सत्ताधारी पक्षातही काहीशी ताठरता येते. एककल्लीपणा वाढत जातो जो अंतिमत: त्यांनाही अडचणीचा व प्रसंगी घातक ठरत असतो. शेख हसिना यांनी स्मार्ट बांगलादेशचा नारा बुलंद केला आहे. देशात शांतता, स्थैर्य आणि भरभराट आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अगोदरच्या टर्ममध्ये या पक्षाने आर्थिक आघाडीवर निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. पायाभूत सुविधांवर दिलेला भर त्यांना आणि देशाला लाभाचाच ठरला आहे. जमेच्या बाजू असतात तशाच उणीवेच्या बाजूही असतात. स्वत: हसिना जेंव्हा विरोधात होत्या तेंव्हा त्यांनीच काळजीवाहू सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेण्याची मागणी ठामपणे आणि जोरकसपणे लावल्याचे त्या देशाच्या नागरिकांच्या स्मरणात आहे. मात्र नंतर स्वत:च त्यांनी काळजीवाहू सरकारचा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवला ही विसंगती नजरेतून सुटण्यासारखी नाही. अमेरिकेने लोकशाहीच्या कथित भल्यासाठी काही निर्देश दिले आहेत, त्यावरही अमलबजावणी होण्याची किमान आतातरी शक्यता नाही.
परराष्ट् धोरणाच्या पातळीवर अमेरिकेला बांगलादेश महत्व देतेच, मात्र भारत आणि चीनही या देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि या तीन देशांच्या दृष्टीने बांगलादेश तेवढाच महत्वाचा आहे. भारत आणि चीनसोबत बांगलादेशची बर्याच क्षेत्रात सहकार्य आणि भागिदारी वाढली आहे. शेख हसिना यांच्यावर त्या भारतधार्जिण्या आहेत असे आरोप झाले असले तरी त्यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या अनुशंगाने किमान आतापर्यंत तरी योग्य संतुलन साधण्यात यश मिळवले आहे. भारताच्या अंगाने विचार केला तर त्यांची राजवट लाभदायी ठरली आहे. एकतर इशान्येकडच्या भागात घुसखोरी आणि हिंसाचार करून बांगलादेशात जाणार्या गटांच्या बीमोडासाठी हसिना यांची भारताला मदतच झाली आहे आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे त्या विकासाची भाषा बोलतात आणि त्यानुसार कार्यक्रमही हाती घेतात. ते त्यांना अन्य कट्टरवादी पक्षांपासून वेगळे ठरवते. बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीचे काही सहकारी कट्टरवादाला प्राधान्य देणारे आणि पाकिस्तानशी जवळीक सांगणारे आहेत. त्यांच्याकडे जर सत्तेचा लोलक स्थिरावला तर तो भारतासारख्या शेजारी देशांना परवडणारा नाही.
बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीच्या बेगम खालीदा झीया यांची राजवटही भारताने पाहिली आहे. त्यासंदर्भातील अनुभव फारसे चांगले नाहीत. त्या कारकीर्दीशी तुलना करता हसिना फार उजव्या ठरतात त्यामुळे त्यांचे महत्व भारताला समजते. बांगलादेश असो अथवा शेजारचा अन्य कोणता देश प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात. त्यात त्यांच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने तेथील सत्ताधारी आणि विरोधकांनी काही भूमिका घेतल्या असतात. नंतर त्या भूमिकेच्या अनुरूप त्यांना जावे लागत असते व तसाच त्यांचा प्रयत्नही असतो. राजकीय पक्षांची ही वर्तणूक किंवा अपरिहार्यता सर्वसामान्य जनतेच्या भावविश्वापासून फार वेगळी असते. त्यांच्या परीने त्यांनी त्यांच्याकरता कोण चांगले आणि कोण नाही हे ठरवून टाकलेले असते. सर्वसामान्य बांगलादेशींच्या मनात इतिहासातील अनुभवावरून भारताबद्दल कोणताही दु:स्वास असण्याची तशी शक्यता नाही. भारतालाही हीच बाब ध्यानात घेत संयमाने राहावे लागणार आहे. कारण शांतता आणि स्थैर्य हेच सगळ्यांत महत्वाचे असते. त्याचे मोल करता येत नाही.