प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यामुळे राज्याचा एका नव्या दिशेने प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून तेथे के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. म्हणूनच तेथे अँटीइनकम्बन्सीची लाट निर्माण होणे स्वाभाविकच होते. मागच्या दोन वर्षांपासून तर केसीआर यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली होती आणि त्यामुळे त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक प्रभृतींच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेसला बाजूला टाकून आपल्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला, तेव्हा पवार यांनी तो जागीच फेटाळून लावला. त्यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली.
अन्य पक्षांतील उपेक्षित नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांतून तर त्यांच्या दोन-दोन पानी जाहिराती सुरू होत्या. शेतकरी व दलितांसाठी त्यांनी सुरू केलेल्या योजनांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली. परंतु त्याचवेळी धरणे, कालवे, रस्ते, पूल यामध्ये बीआरएस सरकारने तुफान भ्रष्टाचार केला, असा आरोप होता. केसीआर यांचा मुलगा व मुलगी, तसेच आणखी इतर कुटुंबीय यांच्या हातातच सर्व सत्ता केंद्रित झाली होती. याविरुद्ध मोठा असंतोष होता आणि त्यांनी तेलंगणास कर्जबाजारी करून ठेवल्याची टीकाही झाली होती. नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे 2019च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते.
रेवंत हे आपल्या विद्यार्थी जीवनात ‘अभाविप’चे सदस्य होते. मात्र, 2006 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक यशस्वीपणे लढवली. त्यानंतर ते 2009 साली तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. विशेष म्हणजे, पाच वेळा आमदार असलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून ते निवडून आले होते. 2009 आणि 2014 मध्ये आंध्र विधानसभेत आणि 2014 ते 2018 या काळात तेलंगणा विधानसभेत आमदार या नात्याने रेवंत यांनी छाप सोडली होती. आपल्या कर्तृत्वामुळे रेवंत हे तेलुगू देसम पक्षाचे विधानसभेतील नेते म्हणूनही गाजले. परंतु त्या काळात ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
या कारणाने तेलुगू देसमने त्यांना पक्षातून काढून टाकले. रेवंत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला; परंतु 2018च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. मात्र, तरीही खचून न जाता, ते काम करत राहिले. त्यामुळे रेवंत यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेसच्या प्रथम कार्यकारी अध्यक्षपदी व नंतर अध्यक्षपदी निवड झाली. रेवंत यांनी केलेल्या अथक आणि प्रभावी प्रचारामुळे तेलंगणा विधानसभेत काँग्रेसला बहुमतापेक्षा चार जादा, म्हणजे एकूण 64 जागा जिंकता आल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव होत असताना, कोणतेही वलय नसलेल्या रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाला यशोमार्गावर नेले, हे विशेष. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची त्यांना संघटनात्मक व साधनसामग्रीची मदत मिळाली.
खर्गे, राहुल व प्रियंका गांधी यांनी तेलंगणात अनेक प्रचारसभा घेतल्या. रेवंत यांनी शपथविधी झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी असलेले लोखंडी कठडे काढून टाकण्यास सांगितले. आपण दररोज लोकांची गार्हाणी ऐकून घेण्यासाठी कार्यालयात विशिष्ट वेळी उपस्थित राहू, असे त्यांनी जाहीर केले असून, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, तेलंगणा हा माझा डीएनए आहे, केसीआर यांचा डीएनए बिहारचा असून, ते मूळचे त्या राज्यातले आहेत. तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा अधिक चांगला आहे, असे उद्गार रेवंत यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रकट मुलाखतीत काढले होते. आता त्यावरून रेवंत यांना भारतात फूट पाडायची आहे, उत्तर व दक्षिण यांच्यात अंतर निर्माण करायचे आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
वास्तविक, मी मूळचा तेलंगणवासी असून, स्थानिक जनतेच्या भावना मला अधिक चांगल्या समजतात, हे ठसवण्याच्या ओघात रेवंत यांनी चुकीचे शब्द वापरले; परंतु कोणत्याही गोष्टीचा विपरीत अर्थ काढून, आपल्या विरोधातील लोकांना बदनाम करणे, ही अलीकडे फॅशनच बनत चालली आहे. आपल्याविरुद्ध ज्या प्रकारे टीका होत आहे, ते नीच स्वरूपाचे राजकारण आहे, असे मागे एकदा प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. त्यावर, आम्ही कनिष्ठ जातीचे असून, आम्हाला प्रियंकासारखे काँग्रेसवाले तुच्छ लेखतात, असा अर्थ लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, तेलंगणात काँग्रेसला जेमतेम बहुमत असून, त्यामुळे तेथील सरकारला अडचणीत आणण्याचे, फोडाफोडी करून ते सरकार पाडण्याचे प्रयत्न होणारच नाहीत, याची खात्री देता येणार नाही.
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच, रेवंत रेड्डी यांनी निवडणुकीत दिलेली सहा आश्वासने पूर्ण करण्यासाठी म्हणून संबंधित फायलींवर स्वाक्षर्या करण्यास सुरुवात केली आहे. महालक्ष्मी, रयतू भरवसा, गृहज्योती, इंदिरम्मा इंदलू, युवा विकासम आणि चेयुथा या सहा गॅरंटीज काँग्रेसने दिल्या होत्या. महिलांना दरमहा अडीच हजार रुपये, पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत बसप्रवास, शेतकर्यांना दरएकरी 15 हजार रुपये, शेतमजुरांना दरवर्षी 12 हजार रुपये, भातपीक घेणार्यांना दरवर्षाला पाचशे रुपये बोनस, प्रत्येकाला दोनशे युनिट वीज मोफत, बेघरांना घरासाठी पाच लाख रुपये, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाच लाख रुपये,
तसेच ज्येष्ठ नागरिकांना चार हजार रुपयांचे पेन्शन आणि दहा लाख रुपयांचा राजीव आरोग्यश्री विमा, अशी आश्वासने काँग्रेसने दिलेली आहेत. ती पूर्ण करण्याइतका पैसा तेलंगणच्या तिजोरीत आहे काय, याचा विचार सरकारला करावाच लागेल. तेवढा निधी नसल्यास, आणखी कर्ज काढावे लागेल. मात्र, तेलंगणात आयटी खेरीज अन्य उद्योगधंद्यांचा विकास करणे आणि शेती फलदायी करून राज्याचे महसुली स्रोत वाढवणे, ही रेड्डी सरकारची जबाबदारी असेल. एका तरी राज्यात काँग्रेसने आदर्श काम करून दाखवल्यास, काँग्रेसची प्रतिमा आपोआप उजळू लागेल.