आरिफ शेख
पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे इम्रान खान क्रिकेटच्या मैदानावर चमत्कार करू शकले; परंतु राजकीय खेळपट्टी भिन्न असते, याचे भान त्यांना आता येत असेल.
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देशांतर्गत वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत आहेत. पाकिस्तानमध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची असो, पडद्याआडचे खरे सत्ताधीश हे लष्करच असते. पाकिस्तानमध्ये हे वारंवार घडले आहे. इम्रान खान हे क्रिकेटच्या मैदानावर पाय रोवून असत. तिथे मनमुराद फटकेबाजी करता येत होती. शेवटच्या चेंडूपर्यंत विजिगिषु वृत्तीने ते खेळत. राजकीय मैदानावर मात्र स्वतःच्या मर्जीप्रमाणे फटकेबाजी करता येत नाही. क्रिकेटमधील चौकार, षटकार तिथे ठोकता येत नाही.
लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या हातच्या कळसूत्री बाहुल्यासारखे सत्ताधारी पक्षाला काम करावे लागते. इम्रान यांना याचा विसर पडू लागला होता. लष्करी गुप्तचर अधिकाऱ्याच्या नियुक्तीत त्यांनी घातलेला खोडा आता त्यांना चांगलाच महाग पडला आहे. गेल्या दोन वर्षांत महागाई, परकीय कर्ज आणि अन्य प्रश्नांची त्यांना नीट हाताळणी करता आली नाही. विरोधी पक्षांनी देशभर त्यांच्याविरोधात काहूर उठवले. लष्कराचे असहकार्य विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडले.
सत्ताधारी पीटीआय या पक्षांतही इम्रान यांच्याविरोधात आवाज उठू लागला. मित्रपक्षही दूर जाऊ लागले. एमक्यूएम (पी) या पक्षाने त्यांची साथ सोडल्याने इम्रान यांचे अवसान पूर्ण गळाले आहे. इम्रान यांच्या युती सरकारच्या आणखी दोन पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने आता इम्रान यांचे सरकार जाण्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. सात खासदार असलेल्या एमक्यूएम-पी या पक्षाने पाठिंबा काढून घेतला, इम्रान खानसाठी हा मोठा धक्का होता. विरोधी आघाडीने नवीन सरकारमध्ये एमक्यूएम-(पी)ला उपपंतप्रधानपद देण्याचे आश्वासन दिले आहे. पाच खासदार असलेल्या “बीएपी’नेही पाठिंबा काढून घेतला आहे. आता सत्ताधारी पीटीआय सरकार समर्थक खासदारांची संख्या 167 वर आली आहे. त्याचवेळी विरोधकांकडे 180 खासदार आहेत.
सरकारला संसदेत बहुमतासाठी 172 सदस्यांची आवश्यकता असते. इम्रान खानचे मित्र जहांगीर तरीन यांनीही केंद्र सरकार आणि पंजाबमधील पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे इम्रान यांच्या पक्षाचे पंजाबमधील सरकारचे जाणेही निश्चित आहे. अविश्वास प्रस्तावावर आता चर्चा सुरू झाली असली, तरी त्यावर रविवारी मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती आणि लष्करप्रमुखांनी इम्रान यांच्या घेतलेल्या भेटी यामुळे इम्रान पंतप्रधानपदी राहणे अवघड दिसते. आता त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याचे आणि राजीनामा देण्याचे टाळले असले, तरी आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा तो प्रयत्न आहे.
इम्रान सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. लष्कराच्या सांगण्यावरून “पीएमएल-क्यू’ आणि “बीएपी’ ने पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान यांना लष्कराशी जोरदार संघर्ष करावा लागेल असे दिसते. पंजाबमध्ये इम्रान यांनी स्वपक्षीय उस्मान बुजदार यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करीत आठ-दहा आमदार असलेल्या चौधरी परवेज इलाही यांना मुख्यमंत्री नियुक्त केल्याने स्वपक्षात सुद्धा बंडाळी माजली आहे. पंजाबमध्येही इम्रान यांच्या पक्षाचे सरकार टिकू शकणार नाही, असे चित्र आहे. महागाई, कर्ज, फसवणूक, वाढती अशांतता आणि हेराफेरीमुळे विखुरलेल्या विरोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाली.
मौलाना फजलुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी एकत्र येऊन “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ नावाची आघाडी तयार केली. देशभरात सरकारविरोधी मोर्चे निघाले. यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. आयएसआय प्रमुख फैज हमीद यांना मुदतवाढ देण्याची इम्रान खान यांची इच्छा होती. अन नदीम अंजुम यांच्या नियुक्तीसाठी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचा दबाव होता. तेथूनच इम्रान खान विरुद्ध लष्कर या वादाची ठिणगी पडली. लष्कराच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे ही इम्रान यांची सर्वात मोठी चूक होती.
गेल्या वर्षी आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाला होता. इम्रानला आपल्या मर्जीतील तत्कालीन प्रमुख फैज हमीद यांना मुदतवाढ द्यायची होती; परंतु त्यांना लष्करापुढे नमते घ्यावे लागले. चोहोबाजूंनी कोंडी झालेल्या इम्रान खान यांनी लष्कराला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लष्कराच्या तटस्थतेच्या भूमिकेवर ते म्हणाले, तटस्थ हे फक्त प्राणी असतात. त्यांनी भारतीय लष्कराचेही कौतुक केले. इम्रान यांच्या काळात अमेरिका आणि सौदी अरेबियाशी संबंध बिघडले. भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचे लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. युक्रेनवर आक्रमण सुरू असताना ते रशियात गेले. त्यामुळे पाकिस्तानची जगात बदनामी झाली.
लष्करप्रमुख कमर बाजवा आणि आयएसआय प्रमुख नदीम अंजुम यांनी इम्रान यांची परवा तातडीनं भेट घेतली. त्यामुळे इम्रान यांनी आपलं भाषण पुढं ढकलले. एकीकडं इम्रान खान आणि त्यांचा पक्ष आपले सरकार वाचवण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. दुसरीकडे सध्याचे सरकार पाडण्यासाठी विरोधकही जोरदार प्रयत्न करीत आहेत. इस्लामाबादमधील सिंध हाउसमध्ये विरोधी पक्षांनी बैठक घेऊन रणनीती आखली. विशेष बाब म्हणजे या बैठकीला इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या नाराज खासदारांसह 196 सदस्य उपस्थित होते. पीटीआयचे खासदार अमीर लियाकत हुसैन यांच्यासह आणखी तीन खासदारही विरोधकांसोबत होते. दुसरीकडे पीटीआय नेते फैसल वावडा यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. विरोधक इम्रान यांना ठार मारण्याचा कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
इम्रान खान यांनी लष्करप्रमुख बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख नदीम अंजुम यांची भेट घेतल्यानंतर गोपनीय पत्राच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (एनएससी) बैठक बोलावली. इम्रान खान यांनी हे गोपनीय पत्र देशातील वरिष्ठ पत्रकारांना दाखवले. 14 पत्रकारांना त्यांनी खास बोलवून घेतले होते. सरकार पाडण्याचे हे परकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला जात आहे. या पत्रावरून पाकच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले आहे. इम्रान खान यांनी या प्रकरणी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी हे पत्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पाकच्या वरिष्ठ राजकीय अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेचे इतिवृत्त आहे, असे समजते. रशिया-युक्रेन वाद चालू असताना इम्रान खान यांनी रशिया दौरा केला, पुतीन यांना भेटले अन् सुरक्षा समितीत मतदानादरम्यान पाकने अलिप्त राहून रशियाला साथ दिली, यावरून अमेरिका अन् युरोपीय महासंघ संतप्त आहेत.
इम्रान यांना हटवा, तुमचे सारे “अपराध’ माफ करू, नाहीतर पाकसाठी येणारे दिवस वाईट असतील, अशी धमकी या पत्रात असल्याचे पाकच्या ज्येष्ठ पत्रकारांनी माध्यमांना सांगितले. एकूणच इम्रान खान यांना हटविण्यात अमेरिकेचा हात आहे व विरोधीपक्ष हे परकीय शक्तीचे बाहुले आहेत, हे दर्शवून इम्रान खान यांना राजकीय हौतात्म्य हवे आहे. हे वादग्रस्त अन् गोपनीयपत्र परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी संसदेत “इन कॅमेरा’ मांडतील. केंद्रीयमंत्री फवाद चौधरी म्हणतात की, “इम्रान हे शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणारे खेळाडू आहेत. ते राजीनामा देणार नाहीत.’ “पाकिस्तानमधील सरकार अस्थिर करण्यामागे अमेरिकेचा हात असेल, तर आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू’, असे चीनने स्पष्ट केले आहे. आता चेंडू कमी अन् धावाचे उद्दिष्ट अधिक, असे चित्र आहे.
“नॅशनल असेंब्ली’चे पीटीआय या स्वपक्षाचे सर्व सदस्य मतदानापासून दूर राहतील किंवा मतदानाच्या दिवशी संसदेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे इम्रान खान यांनी सांगितले असले, तरी तसे होईलच याची खात्री नाही. विरोधी आघाडी “पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट’ने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू व विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले आहे. पाकिस्तानातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांचे निर्गमन जवळपास निश्चित आहे. आता शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होऊ शकतात.
पाकच्या इतिहासात आजवर तीनदा पंतप्रधानांवर अविश्वास ठराव आला होता, पैकी एकही मंजूर झाला नाही. अविश्वास ठरावाद्वारे पद गमावणारे पहिले पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांची नोंद होऊ शकते. शिवाय आजवर कोणाही पंतप्रधानाला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. ती “परंपरा’ या निमित्ताने जपली जात आहे. एकूणच इम्रान खान यांनी आपल्या अकार्यक्षमतेने ही वेळ ओढवून घेतली आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास ते “हिट विकेट’ होण्याची चिन्हे आहेत.