नवी दिल्ली – 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपच्या पराभवाबाबत मोठं भाकित केलं आहे. तसेच आगामी पाच राज्यांतील निवडणुकांसंदर्भातही मत नोंदविले.
प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, काँग्रेसची स्थिती कमकुवत असल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष विजय मिळविण्याची शक्यता आहे. मात्र 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं.
किशोर म्हणाले की, पुढील महिन्यात देशात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप विजय मिळवू शकतं. पण 2024 मधील निवडणुकीत भाजपचा पराभव करता येईल.
याआधीचा इतिहास पाहिला तर 2012 मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार आलं होतं. उत्तराखंडमध्ये काँग्रेस सत्तेत होतं. मनिपूरमध्येही काँग्रेसने विजय मिळवला होता. तर पंजाबमध्ये अकाली दलाची सत्ता आली होती. मात्र तरी देखील २०१४ मध्ये केंद्रात भाजपचा विजय झाला. हे एकदम विरुद्ध होतं.
लोकसभेच्या जागांचा संदर्भात देत किशोर म्हणाले की, “तुम्ही बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील सुमारे 200 मतदार संघांचा विचार केल्यास येथे भाजपला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही, केवळ ५० जागा मिळाल्या. तर उरलेल्या 350 जागांवर भाजपने सरसकट विजय मिळवला.
दरम्यान काँग्रेससोबत इतर प्रादेशिक पक्षांनी युती करत रणनिती आखली आणि आपलं सर्वस्व पणाला लावलं तर लोकसभा निवडणुकीत २५० ते २६० जागांपर्यंत पोहचू शकतील, असंही किशोर यांनी स्पष्ट केलं.