नवी दिल्ली – ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अखेरचा निर्णय आणि सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून येणे अद्याप बाकी आहे. 31 जुलैला मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्ट रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असून त्यानंतर जाहिर होईल.
चेतन सिंहच्या सहकाऱ्यांचीही चौकशी
दुसरीकडे ट्रेनमधील गोळीबार प्रकरणात आरोपी आरपीएफ शिपाई चेतन सिंह याच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन आरपीएफ जवानांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चेतनने गोळीबार केल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घाबरुन स्वत:ला टॉयलेटमध्ये बंद करुन घेतले होते. तर सूत्रांच्या माहितीनुसार, चेतनने आपल्या मानसिक आजाराबद्दल विभागाला कोणतीही माहिती दिली नव्हती.